सातारा : ‘जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे. विसर्जनासाठी गाडोली ग्रामस्थांनी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. गोडोलीकरांनी घेतलेल्या पुढाकाराचे अनुकरण इतर वॉर्डमधील नागरिकांनी करावे, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या वेदांतिकाराजे याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक अॅड. दत्ता बनकर, डॉ. अविनाश पोळ यांच्या पुढाकाराने गोडोलीकरांनी अण्णासाहेब कल्याणी विद्यालया-जवळ ५० फट लांब, ७० फूट रुंद, २० फूट खोलीचे तळे निर्माण केले आहे. या तळ्याची पाहणी वेदांतिकाराजे यांनी केली. यावेळी नगरसेवक अॅड. बनकर, डॉ. पोळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे कृषी सभापती किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सदस्य वनिता कण्हेरकर उपस्थित होते. वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. गणशोत्सव हा मांगल्याचा उत्सव आहे. तो साजरा करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक घरात आणि मंडळाने शाडूचीच मूर्ती बसवली पाहिजे. एक गाव- एक गणपती, एक वॉर्ड- एक गणपती, डॉल्बीमुक्त उत्सव अशा संकल्पना राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा.’ यावेळी फिरोज पठाण, रवी पवार, शेखर गोरे- पाटील, अरुण राजेभोसले, विनायक कांबळी, रवी महाडिक, विलास शिंंदे, मधुकर काळे, पोपट मोरे, भैय्या बनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोडाली ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा
By admin | Updated: July 27, 2014 23:02 IST