सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बोले कुटुंबीयांसाठी तब्बल तीस हजार रुपयांची मदत गोळा करून आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, सदर बझार येथील भारतमाता मंडळाने दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन बोले कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. अनंत चतुर्दशीच्या रात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रकांत बोले यांना प्राण गमवावे लागले होते. पत्नी आणि चार मुली अशा त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन केल्यावर निधीचा ओघ सुरू झाला. बोले यांच्या मुली त्यांची वडापावची गाडी पुन्हा सुरू करण्याची जिद्द बाळगून आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कॉलेजमध्ये लाकडी पेटी तयार करून त्यांनी सर्वांकडून मदत गोळा केली. विद्यार्थ्यांबरोबरच, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग नोंदविला आणि तब्बल तीस हजार रुपये जमा झाले. ही रक्कम बुधवारी बोले कुटुंबीयांना देण्यात आली. सदर बझार येथील भारतमाता मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकीचे भान राखून उत्सव साजरा करीत असते. या मंडळाने डॉल्बीसारख्या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ससे यांच्यासह विकास धुमाळ, धनेश भोसले, सुजित जाधव, सुनील भुतकर, राजेंद्र रजपूत, अमय भुतकर, नितीन संकपाळ आदींनी यंदा दुर्गोत्सव साधेपणाने आणि काटकसरीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि बोले कुटुंबीयांना बुधवारी मदतीची रक्कम सुपूर्द केली. याखेरीज आयुर्विमा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही बुधवारी मदत दिली. विविध संस्था, संघटनांनी याकामी निधीचे संकलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी जमविले ३० हजार--भारतमाता मंडळाकडूनही बोलेंना मदत
By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST