सातारा : तलाक देण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भोसरी, पुणे येथील चौघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयात सुनावण्यात आली. मारहाणीची ही घटना शिरवळ (ता. खंडाळा) येथे घडली होती. या मारहाणीत चाकू व काठीचा वापर करण्यात आला होता.याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, ३ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिरवळ येथे राहत्या घराजवळ सज्जाद जलालउद्दीन काझी (वय ३१) याला तलाकच्या कारणावरून चाकू व काठीने मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सज्जादची आई शमशाद जलालउद्दीन काझी (५९) यांनी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली होती. त्यानंतर रेश्मा नबीब शेख, मतीन नबीब शेख, मन्सूर नबीब शेख आणि फारूख नबीब शेख यांच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयात लागला. पहिले तदर्थ अतिरिक्त व जिल्हा सत्रन्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी चौघांना जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
‘तलाक’साठी प्राणघातक हल्ला; चौघांना जन्मठेप
By admin | Updated: June 22, 2014 00:18 IST