सातारा : सातारा शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. हे कुत्रे आता रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या सीट फाडत आहेत. दुचाकीधारकांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. संबंधित विभागाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
००००००००००
राजकीय चर्चा सर्वत्र
सातारा : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. अर्जांची छाननी होत असल्याने ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता अर्ज मागे घेण्यासाठी उद्या, सोमवारपर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींच्या हालचाली वाढल्या आहेत.
००००००००००
एसटीचे चाक निखळले
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीजवळ पाटण-सातारा या एस.टी. बसच्या उजव्या बाजूचे चाक निघून पडले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. कोणालाही इजा झालेली नाही. त्यानंतर पर्यायी गाडी बोलावून त्यातून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पाठवून दिले.
००००००
शनिमंदिरांत गर्दी
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मंदिरात जाता येत नव्हते. मात्र आता मंदिरे सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी साताऱ्यातील शनिमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली अनुभवास मिळत आहे.
०००००
पंचमुखीसमोर गर्दी
सातारा : संकष्टी चतुर्थी असल्याने साताऱ्यातील पंचमुखी गणपती मंदिरात दर्शनासाठी शनिवारी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेशोत्सव मंदिरातही भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते.
०००००००००००
मोबाईल चार्जर गरजेचे
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी येत असतात. अनेकजण लांब पल्ल्याचा प्रवास करतात. या प्रवासात मोबाईल बंद पडतो. तेव्हा बसस्थानकात सार्वजनिक स्वरूपाचे चार्जर बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.
००००००००००००
अभियान सुरू
सातारा : जिल्ह्यात पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा ’हे अभियान नुकतेच सुरू झाले आहे. ते मंगळवार (दि. १५)पर्यंत चालणार आहे. यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यात नागरिकांचाही सहभाग वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
००००००००
उद्योजकता मेळावा
मेढा : श्री विठ्ठल वारकरी परिवार व उद्योगसमूहाच्या माध्यमातून आज, रविवारी मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात उद्योजकता मेळावा आयोजित केला अहो. यामध्ये शासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ‘कोरोनानंतरची परिस्थिती’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
००००००००
प्लास्टिकचा वापर
सातारा : ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. तरीही साताऱ्यात बाजारपेठेत खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यामध्ये फळे विक्रेते, भाजी विक्रेतेही ग्राहकांनी मागणी केलेली नसतानाही प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू घालून देत असतात. त्यामुळे कारवाईची मागणी होत आहे.
००००००००००
झाडे धोकादायक
सातारा : ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी रस्त्याकडेची झाडे वठलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुकीला धोका संभवत असतो. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून वटलेल्या झाडांचा धोका कमी करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
०००००००००
मंगळवारी कार्यक्रम
सातारा : रयत शिक्षण संस्थेतर्फे मंगळवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ऑडिटर, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली.
०००००००००
गार वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण कायम
सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असला तरी गार वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडी जाणवत आहे. त्यामुळे शहरात लवकरच सामसूम जाणवत आहे. याचा त्रास विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कायमच असल्याने ही थंडी कधी थांबेल याची ज्येष्ठ नागरिक वाट पाहत आहेत.
००००००
तहसीलसमोर खड्डा
सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील रस्ते चांगले झाले आहेत. त्यामुळे वाहतूक सुसाट झाली आहे. मात्र पोवई नाक्याकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्याच्या मार्गावर चांगला रस्ता संपतो तेथेच मोठा खड्डा आहे. त्यामुळे वाहन आदळून अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
०००००००००
फलकांची गरज
सातारा : सातारा-फलटण मार्गावरील अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची दिशा वाऱ्यामुळे बदलली आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांची फसगत होत असते. या रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
०००००००००
साताऱ्यात सैनिकांसाठी तक्रार मेळावा
सातारा : सातारा पोलीस दलातर्फे ११ जानेवारीला सकाळी नऊ वाजता आजी, माजी सैनिक, त्यांच्या नातेवाइकांसाठी तक्रार मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आजी, माजी सैनिक, त्यांच्या नातेवाइकांच्या समस्या सोडविण्याबाबत प्रयत्न होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन सातारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
---------
आडवा फोटो ०२कुडाळ-डीपी
दुर्गम भाग प्रकाशाच्या वाटेवर
जावळी तालुक्यातील अनेक गावे दुर्गम आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अशा गावांमध्ये प्रकाश यावा यासाठी वीज वितरण विभाग धडपडत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी डोंगरमाथ्यावर ‘जोर लगाके हाय ही शा’ म्हणत विद्युतवाहिनी उभारणी करण्याचे काम करीत आहेत. (छाया : विशाल जमदाडे)