सातारा : पगारपत्रक धोरणाच्या विरोधात राज्य परिवहन महामंडळातील ‘इंटक’ एसटी कामगार संघटनेने गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी दुपारी मागे घेण्यात आले. या काळात जिल्ह्यातील सुमारे सहाशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, जे कर्मचारी संपात सहभागी न होता कर्तव्य पार पाडत होते. त्यांना गुलाब फूल देऊन सातारा आगारात ‘गांधीगिरी’ करण्यात आली. सातारा आगारातील २५ टक्के फेऱ्या दोन दिवसांत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत १०९ फेऱ्या रद्द केल्या होत्या. यामुळे महामंडळाचे दोन दिवसांत सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या संपाची तीव्रता साताऱ्याबरोबरच कऱ्हाड, फलटण, दहिवडी आगारात मोठ्या प्रमाणात जाणवली. (प्रतिनिधी) कऱ्हाडमध्ये दीड दिवसात साडेपाचशे फे ऱ्या रद्द कऱ्हाड : राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महावितरणच्या बरोबरीने २५ टक्के पगार वाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेस इंटक, संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात कऱ्हाडमधील दोनशे कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता. दीड दिवस सुरू असलेल्या संपातून योग्य तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, या दीड दिवसाच्या संपात एसटी च्या साडेपाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही नुकसान सहन करावे लागले. कऱ्हाड आगारात एकूण ५४८ कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी २१५ कर्मचारी ‘इंटक’संघटनेत कार्यरत आहेत. गुरुवारी राज्यभरातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये कऱ्हाड आगारातील कर्मचारीही सहभागी झाले होते. कऱ्हाड येथील इंटक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुरेश ढवळे, नरेंद्र मोरे, शकील नदाफ, दिलीप पवार, आबासो पाटील, उत्तम जाधव, विभागीय प्रतिनिधी मुराद मुजावर, केंद्रीय पदाधिकारी राम वीर, सूर्यकांत जाधव, संपतराव पिसाळ, जितेंद्र मोहिते, एस. एस. चव्हाण, मानिक डिंगणे, संजय तेली, जे. डी. पाटील, अरुण जाधव, संतोष भोसले आदींनी संप सुरू केल्यामुळे आगारातील एसटी बसेसच्या साडेपाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटी प्रशासनाला आर्थिक तोटा सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
संपात बस चालविणाऱ्यांना गुलाब
By admin | Updated: December 19, 2015 01:06 IST