दुरुस्तीची मागणी
सातारा : गेंडामाळ नाका ते कोटेश्वर मंदिर या दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर सतत रहदारी असते. रस्त्यात खड्डे असल्याने वाहनचालकांना व पादचाऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. संबंधितांनी तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
रोपे गेली वाळून
सातारा : सातारा जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालय परिसरात बागा तयार केल्या आहेत. या बागेत विविध प्रकारची झाडे लावली आहेत. या झाडांना मुलं घरून आणलेले पाणी टाकत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे परिसरात रोपे जळून चालली आहेत. या ठिकाणी पाणी घालण्यासाठी पर्यायी सोय करण्याची मागणी केली जात आहे.
गॅरेजवर वाहनांची गर्दी
सातारा : उन्हाळा वाढू लागल्याने वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गाड्या गरम होऊन इंजिन खराब होत असल्याने वाहने गॅरेजवर मोठ्या प्रमाणात जात आहेत.
टोमॅटोचे दर उतरले
पुसेगाव : गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने विकले गेले टोमॅटो आता २० रुपयांवर घसरले आहे. सर्वच भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोसळल्याचे चित्र असताना टोमॅटोचे दर उतरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : येथील राजवाडा परिसरातील चांदणी चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. या चौकात माल वाहतूक करणारी वाहने तसेच अन्य वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
देशी गवार महागली
सातारा : येथील भाजीमंडईत देशी गवारीची आवक कमी झाली आहे. यामुळे ग्राहकांना गवारची खरेदी करता येत नाही.
साईडपट्टी खचली
तारळे : नागठाणेपासून तारळे रस्त्यावर रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरुन आल्यानंतर कोणी वाहन खाली घ्यायचे, यावरून त्यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साईडपट्टी टाकण्याची मागणी होत आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो.
नवीन जलवाहिनी
सातारा : येथील गेंडामाळ झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी नवीन जलवाहिनी टाकून जीवन प्राधिकरणाच्यावतीने पाणीपुरवठा केला जात आहे.