सातारा : सातारा शहरालगत देगाव फाटा, शिवराज चौक, वाढे फाटा या परिसरात उड्डाणपूल व रस्त्यावरून जाणाऱ्या ओव्हरलोड मातीच्या वाहनांमुळे शेंद्रे परिसरातील रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यातच सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
०००००००००
खड्डेमय रस्ता
दहिवडी : माण तालुक्यातील मार्डी-खुटबाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडी उखडली आहे, तर बऱ्याच ठिकाणी रस्ता खड्डेमय बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
००००००००
मास्कचा वापर वाढला
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी झालेली दिसत असली तरी, धोका कायम आहे. त्यातच पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे मुले सुरक्षित राहावीत, यासाठी पालक मंडळी प्रत्येक मुलांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे मास्कला मागणी वाढत आहे.
०००००००
मोरांचा वावर कमी
सातारा : तालुक्यात ठिकठिकाणी नदीकाठच्या शिवारात मोरांचा वावर वाढलेला असतो. नदीकाठी सकाळी सकाळी मोरांचे आवाज घुमत असत. शहरातही महादरे, आंबेदरे, शाहूपुरी या परिसरात असे आवाज येत असतात. त्यामुळे दररोज सकाळी उल्हासी वातावरण जाणवत असे. मात्र काही दिवसांपासून इकडे मोरांनी पाठ फिरवली आहे.
०००००
पाणीसाठा टिकून
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी परिसरातील बंधाऱ्यात अजूनही पाणीसाठा टिकून आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांनाही पाणी उपलब्ध होणार आहे. ओढ्यावर अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात आलेले आहेत. बंधाऱ्यात पाणीसाठा टिकून आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
००००००००
मुके प्राणी, पक्ष्यांच्या संगोपनाचे आवाहन
सातारा : जिल्ह्यातील विविध भागात मुके प्राणी, पक्षी यांच्या उपजीविकेसाठी नवीन अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याला सहकार्य करण्याचे आवाहन भूमाता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, जिल्हा संयोजक निनाद पाटील, राम पुजारी, नरेंद्र बर्गे, किसोर चोरगे यांनी केले आहे.
००००
डोंगराला आग
पुसेसावळी : माण-खटाव तालुक्याच्या सीमेवरील घाटातील डोंगराला आग लावली जात आहे. यामुळे वन विभागाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा विचार करून आग लावणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील पर्यावरणप्रेमींंमधून वारंवार केली जात आहे.
००००
इमारतींची स्वच्छता
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अनेक इमारतींमध्ये नियमित स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. तसेच काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे पुन्हा जंतुनाशक हात धुण्यासाठी ठेवले जात आहे. याचा वापर बाहेरून येणारे करत असतात.
००००००
सत्काराला अडीच हजार गुलाबांचा हार
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देऊर ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांची एकहाती सत्ता आल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. यातच आताच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात गेलेले एकेकाळचे त्यांचेच विश्वासू मावळे, गोकुळ राणभरे व नंदकुमार महामुनी हे पुन्हा स्वगृही परतल्यानंतर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, सरपंच शामराव कदम, उपसरपंच श्रीधर कदम व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी नीलकमल फ्लॉवरचे मालक करपे बंधू यांच्याकडून तब्बल २५०० गुलाबांपासून बनविलेला हार घालून त्यांचा सत्कार केला.
२१देऊर
०००००००००००००००००००००००००००
अपघाताची भीती
सातारा : सातारा शहरातील बोगदा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. बोगदा मार्गावर मोठे खड्डे आहेत. त्यामुळे दुचाकीसारख्या वाहनचालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मोठ्या वाहनचालकांना थांबून किंवा खड्डयातून हळू हळू प्रवास करावा लागत आहे. खड्डे डांबरीकरणाने मुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
००००००
रोपे लागली सुकायला
सातारा : सातारा शहरात काही सामाजिक संघटनांकडून शहरातील प्रमुख रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले होते. आता उन्हाळा सुरू असल्याने ही रोपे सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी, नागरिकांनी या रोपांना पाणी घातल्यास ती चांगली वाढणार आहेत.
०००००००००