सातारा : सातारा तालुक्यातील नागठाणे ते सासपडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. नागठाणे-सासपडे रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे चुकवत कसे जायचे, हा प्रश्न सतावत आहे.
चौकात अस्वच्छता
सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री हाच कचरा विस्कटतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो.
रस्त्यावर स्टंटबाजी
सातारा : शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवर बसून स्टंटबाजी सुरू असते. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाकी बेफामपणे चालवत येत असतात. तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात.
वाहनांचे नुकसान
सातारा : सातारा-कास रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटातून कास मार्ग जातो. या मार्गावर घाटातही जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तसेच साईडपट्ट्याही खचल्या आहेत, तर कासकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. चऱ्या पडल्या आहेत.
कुत्र्यांचा उपद्रव
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरपासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेकवेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. या ठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात. तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्या असतात; पण अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही. त्यावेळी नागरिक कशाही पद्धतीने दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाडी बाहेर काढता येत नाही.
वृक्षारोपणाची मागणी
सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करणयात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरून जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे पाडण्यात आली. रस्त्याच्या बाजूला झाडे दिसतात.
ऊसतोडणीला वेग
सातारा : साताऱ्यासह बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या ऊसतोड सुरू असल्याचे दिसत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होते. सध्या अनेक कारखाने सुरू झाले आहेत.
माहुली रस्ता खड्डेमय
सातारा : क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.