अंगापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून नादगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अंगापूर वंदनमधील नागरिकांसाठी एवार्जीनाथ सभामंडपात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास दीडशे स्थानिक व्यावसायिक तसेच नागरिकांनी सहभागी होऊन प्रतिसाद दिला. यामध्ये १२४ नागरिकांची अँटिजन, तर २६ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
यावेळी सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, सदस्य मच्छिंद्रनाथ नलवडे, हणमंत सुतार, नवनाथ गायकवाड, नीलम कणसे, वैशाली जाधव, हेमलता भुजबळ, ग्रामविकास अधिकारी आत्माराम पवार, तलाठी एस. पी. माने, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज जाधव, डाॅ. प्रवीण जाधव, आरोग्य सेवक दशरथ गुजर, सेविका उज्ज्वला गायकवाड, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, स्थानिक व्यवसायिक, नागरिक उपस्थित होते.
ग्राम प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या सहा महिन्यांच्या दरम्यान नगण्य कोरोना रुग्णसंख्या आढळून आली. ही संख्या कमी असली तरी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५० गावपातळीवर विविध व्यावसायिक व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १२४ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली.
त्या सर्व चाचणी केलेल्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बाब गावाच्या दृष्टीने दिलासादायक आहे. या अहवालामुळे ग्राम प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या उठावदार कामावर काहीसे शिक्कामोर्तब झाले असे वाटत असले, तरी २६ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. याचे अहवाल दोन दिवसांत येणार आहेत. त्यानंतरच या शिबिरातील रुग्णसंख्येचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
फोटो १९अंगापूर कोरोना
सातारा तालुक्यातील अंगापूर येथील कोरोना चाचणी शिबिरास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. (छाया : संदीप कणसे)