वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील चार हजार लोकसंख्या असलेल्या विरळी येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या थोपविण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाला चांगलेच यश मिळाले आहे. प्रशासनाचे मार्गदर्शन व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गाव कोरोनामुक्त करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत.
विरळीसारख्या डोंगरकपारीत असणाऱ्या गावात कोरोनामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर गावातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरपंच, ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘माझे गाव माझे कुटुंब’ अशी संकल्पना करून गावातील प्रत्येक नागरिकाने यामध्ये पुढाकार घेतला. ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील हायस्कूलमध्ये सुसज्ज असा ३० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला.
यामध्ये रुग्णांच्या औषध-गोळ्या, रक्त तपासण्या, चहा, नाश्ता आणि जेवणाचा खर्च मोफत करण्यात आला. या सेंटरमधून एकूण २० रुणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. बाहेर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना गावकऱ्यांकडून वर्गणी काढून मदत करण्यात आली. गावात सातत्याने निर्जंतुक फवारणी केल्याने आणि ग्रामस्थांनी शासनाच्या सूचना आणि नियमांचे पालन करून गाव कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले आहे.
प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, डॉ. सावंत, डॉ. प्रशांत घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रशांत गोरड, ग्रामसेवक तानाजी गंबरे, आरोग्य सेविका राणी काळेल, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व युवकांनी कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले.
(कोट)
विरळी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले. सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आणि एकजुटीने गावाने कोरोनावर मात केली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून विरळीत एकही कोरोना रुग्ण नाही. गावकऱ्यांच्या सहकार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल.
- प्रशांत गोरड, सरपंच