फलटण : फलटण नगर परिषदेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी बिले दिली असून, ती नागरिकांनी भरू नयेत, असे आवाहन नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
फलटण नगर परिषदेने दोन वर्षांपूर्वी अमरावतीच्या कंपनीकडून फलटण शहरातील घरे व व्यापारी गाळ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी नगर परिषदेने घरपट्टीच्या दरात जवळजवळ तीन पटीने वाढ केलेली होती. या वाढीव घरपट्टीविरोधात फलटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव यांनी सर्वपक्षीय आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला यश मिळून अमरावतीच्या कंपनीकडील सर्वेक्षण रद्द ठरवून घरपट्टी कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले होते.
वास्तविक सुनावणी झाली; परंतु त्याचा कोणताही निकाल न देताच नगर परिषदेने फलटणमधील नागरिकांना वाढीव रकमेची घरपट्टी बिले पुन्हा पाठवली आहेत. त्यामुळे फलटणमधील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी जुनी व कमी रकमेची बिले व आज आलेली वाढीव बिले यांची झेरॉक्स काढून आमच्याकडे जमा करावी. वाढीव रकमेची बिले कमी होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनी घरपट्टी भरु नये, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिक रोजगाराविना घरी बसून आहेत. दुकाने व रोजगार बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच फलटण नगर परिषदेने वाढीव घरपट्टीची बिले देऊन नागरिकांवर अन्याय केला आहे. ही वाढीव घरपट्टी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.