कऱ्हाड : ‘मुलगी म्हणजे परक्याचे धन, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ हा पारंपरिक विचार सध्याच्या काळातही कमी झालेला नाही. परिणामी स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्याला आळा बसावा, मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शेरे, ता. कऱ्हाड येथील रामचंद्र पाटील व शालन पाटील या दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी आगळीवेगळी कल्पना मांडली आहे. गावात यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे सुमारे एक हजार रुपयांची ठेवपावती करण्याचा अनोखा पायंडा ते सुरू करत आहेत. त्यांचा हा उपक्रम इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. मुंबई येथील निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पाटील हे मूळचे शेरे या गावचे. सध्या शेरे येथेच शेती व्यवसायात ते चांगलेच रमले आहेत. शहरी वातावरणात काम केलेल्या पाटील यांना गावाकडच्या लोकांच्या विचारात मुलींच्या जन्माविषयी असणारी संकुचित विचारसरणी पाहायला मिळाली. त्यामुळे व्यथित झालेल्या पाटील दाम्पत्याने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने हा विचार नुसता न मांडता स्वकृतीतून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यास प्रत्यक्ष सुरुवात ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करत आहेत. लग्न होऊन गावात येणाऱ्या मुलींची माहेरवाशिणीप्रमाणे सासरीही काळजी घेतली जावी, तसेच तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी इच्छा मनाशी धरून गावातील प्रत्येक कुटुंबातील सुनेला आपली मुलगी मानत तिला होणाऱ्या मुलीसाठी आपल्याकडून छोटीशी भेट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या मुलीच्या बारशादिवशी संबंधित सुनेची ओटीभरून तिच्या मुलीच्या नावे एक हजार रुपये पोस्ट कार्यालयात टाकून मुलीस अनोखी भेट ते देणार आहेत. ज्या मुलीच्या नावे एक हजार रुपये पोस्ट कार्यालयात टाकले जाणार आहेत. ही रक्कम मुलगी वीस वर्षांची झाल्यानंतरच तिला मिळणार आहे. यामुळे मुलीचे शिक्षण तसेच लग्न होण्यासही त्यामुळे थोडाफार हातभार लागणार आहे.रामचंद्र पाटील व शालन पाटील यांच्या लग्नास ४५ वर्षं पूर्ण झाली आहेत. शेतीतून व पेन्शनमधून मिळणारे पैसे हे त्यांनी सत्कार्यासाठी मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, दि. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी रामचंद्र पाटील हे आपण घेतलेला निर्णय गावात भरणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांपुढे मांडणार असून, पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे शेरे ग्रामस्थांकडून नक्कीच स्वागत केले जाईल, हे नक्की ! (प्रतिनिधी) पाटील दाम्पत्याचा निर्णय ‘योग्यच’समाजात मुलींचे जन्मदर हे मुलांच्या जन्मदरापेक्षा कमी झाले आहे. ग्रामीण भागात विशेष करून मुलींचे प्रमाण घटले आहे. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन,’ असे मानत आजही मुलीला कुटुंबात फार कमी महत्त्व दिले जाते. मात्र, सध्याच्या काळात मुलगी हीच घर योग्य प्रकारे चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. म्हणून पाटील दाम्पत्याने घेतलेला हा निर्णय योग्यच असून, तो कौतुकास्पद आहे.शासनाने दखल घ्यावी, असा निर्णयसमाजातील मुलींच्या कमी होणाऱ्या प्रमाणाबाबत शासनाकडूनही विविध योजना राबवून समाजात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, मोफत एसटी पास, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अशा विविध योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत. अशामध्ये शेरे गावातील पाटील दाम्पत्याने मुलीच्या नावे एक हजार रुपये ठेव म्हणून टाकण्याचा घेतलेला निर्णय हा इतरांपुढे आदर्श ठेवण्याजोगा आहे.
‘कन्यारत्ना’साठी पाटील दाम्पत्याचा ‘आधार’
By admin | Updated: August 14, 2015 21:44 IST