अरूण पवार - पाटण -आगामी विधानसभा निवडणुकीचे पडसाद पाटण पंचायत समितीतदेखील उमटू लागले आहेत. पाटणकर आणि देसाई गटांत केवळ ‘सही’च्या मुद्द्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यदिनीच सभापती वनिता कारंडे यांना खिंडीत गाठून पाटणकर गटाच्या सदस्यांनी सहीसाठी घेराव घातला तर एकट्या सभापती असल्याचे ओळखून पाटणकर गटाच्या सदस्यांनी केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप देसाई गटाकडून केला आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच्या कालावधीत दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमकी होणार, अशी चिन्हे आहेत. १४ सप्टेंबरला पाटण पंचायत समितीचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपणार आहे. त्यातच आमदारकीच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अडीच वर्षांची पहिली टर्म शंभूराज देसाई गटाच्या ताब्यात जाऊन वनिता कारंडे या सभापती झाल्या तर पाटणकर गटाचे राजाभाऊ शेलार उपसभापती आहेत. मात्र, सत्ता असूनही ती राबविता आली नाही आणि सभापतींना इतरांची साथ नाही. यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत पाटणकर गटाने सभापतींना टार्गेट करून बाजी मारली. यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उद्घाटनावरून सभापतींचे पती बांधकाम अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादात अडकले तर सभापती दीर्घकाळ रजेवर राहिल्याने लोकांची कामे रखडली, असे आरोप पाटणकर गटाकडून झाले. १५ आॅगस्टला पाटण पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमाला सत्ताधारी देसाई गटाच्या सभापती उपस्थित होत्या. तर पाटणकर गटाचे सहा सदस्य उपस्थित होते. ११ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेत पाच कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येऊन तो कोणत्या गावांना वाटप करण्यात आला ती यादी वाचून दाखविली. त्यावर एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ठराव मंजूर झाल्याचे समजण्यात आले. त्या ठरावावरून गटविकास अधिकाऱ्यांनी सही केली. मात्र सभापतींची सही होणे गरजेचे होते.‘सही’चे घोडे इथेच अडकले !मंजूर झालेला पाच कोटी दहा लाखांचा निधी आमच्यामुळे मिळाला असल्याचा दावा विरोधी गटाच्या सदस्यांनी केल्यामुळे साहजिकच सभापती वनिता कारंडे यांनी त्या ठरावावर सही करण्याअगोदरच सावध पवित्रा घेतला . त्यामुळे ‘स्वातंत्र्यदिनीच सक्तीने सही करा,’ असा आग्रह धरण्याची रणनीती गडबडली. त्यामुळे पाटण पंचायत समितीत सहीचे राजकारण भरपूर झाले असले तरीही; नेमके घोडे इथेच अडले.
पाटण पंचायत समितीत ‘सही रे सही’ राजकारण
By admin | Updated: August 22, 2014 00:56 IST