सातारा : शहरातील गल्लीबोळातील रस्त्याची चाळण झाल्याने सातारकर दोन वर्षांपासून हैराण झाले होते. त्यानंतर पालिकेने सर्वच प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण केले; पण हे सुख सातारकरांना फार काळ मिळेल, असे वाटत नाही. जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चक्क पाच महिन्यांतच डांबरी रस्त्यावर टिकाव मारला आहे. चारही बाजूंना डोंगराने वेढलेल्या सातारा शहराला वाढण्यास फार वावच मिळालेला नाही. त्यामुळे वरचा बोगदा, राजपथ व खालचा रस्ता तसेच राधिका रोड या मार्गावरच शहर विभागले गेले आहे. त्याचप्रमाणे सातारा शहरातील सरासरी पर्जन्यमानही चांगले असल्याने उतारावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे रस्त्याची चाळण लवकरच होत असते.सर्वच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातारकर तीन-चार वर्षांपासून वैतागले होते. रस्त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. काही सामाजिक संघटनेने याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करणे, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी अनोखे आंदोलने केली होती. तर काही वेळा रस्त्यावरील खड्डे मोजण्याची मोहीम राबविली गेली होती. सरतेशेवटी पालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हाती घेण्यात आले. डांबरीकरणामुळे चकाचक झालेल्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या; पण सातारकरांचे हे सुख फार टिकेल, असे वाटत नाही. डांबरीकरणापूर्वी सर्वच भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. तसेच या योजनेची चाचणीही घेण्यात येत होती. तत्पूर्वी नवीन नळजोडण्या घेण्यासंदर्भात सूचना करून सातारकारंना मुदत दिली होती. तरीही या ठिकाणी जुन्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. खालच्या रस्त्यावर शेटे चौकाजवळील नकाशपुरा भागात जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून पाणी येत नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. पोलीस मुख्यालयापासून जागोजागी खोदकाम करून जुनी जलवाहिनी तपासली जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्यानंतर पूर्ववत रस्ता करावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)या खड्ड्यांचे प्रायोजकनुकताच साजरा झालेल्या गणेशोत्सवात खालच्या रस्त्यावर विद्युत रोषणाई व जाहिरात फलक लावण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच खड्डे खोदून बांबू रोवण्यात आले होते. हे करत असताना ‘बीएसएनएल’ची जमिनीतील केबल तुटली गेली. त्यामुळे विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी ‘बीएसएनएल’ला खड्डे खोदावे लागले होते.
चकाचक रस्त्यावर पाचच महिन्यांत टिकाव!
By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST