ऑनलाइन लोकमतसातारा, दि. १३ : गावाला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी तीन वर्षापुर्वी बांधलेली टाकी दीड लाख लिटर पाण्यासह अचानक कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र, दोन कार व पाच दुचाकी पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले.दरम्यान, टाकी कोसळताना परिसरातील जमिन हादरल्यामुळे भुकंपाच्या शक्यतेने ग्रामस्थ घराबाहेर धावले. मात्र, पाण्याची टाकी कोसळल्याचे दिसताच जीवाच्या आकांताने ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी पळाले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी रात्री ही टाकी पाण्याने पुर्ण भरण्यात आली होती. अचानक या टाकीचे पिलर मोडल्यामुळे पाण्यासह ही टाकी जमीनदोस्त झाली. टाकीनजीक उभ्या केलेल्या दोन कार पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्या. एक कार नदीकाठावरील पाय-यांवरून वाहत जाऊन झाडामध्ये अडकली. तर दुसरी कार पाय-यांवरून पाणवठ्यापर्यंत फेकली गेली. तसेच पाच दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह कार्यकारी अभियंता सुनील पाटील, पंचायत समिती सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव, सत्यजितसिंह पाटणकर, जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच टाकी बांधणारे ठेकेदार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे हेसुद्धा त्याठिकाणी आले.त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.