सातारा : सातारा शहरातील सुमारे १६ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरळीत झाली. सुमारे नऊ हजार परीक्षार्थींनी दोन टप्प्यांत ही परीक्षा दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. दरम्यान, महिला उमेदवार परीक्षा देण्यासाठी गेल्यावर कुटुंबातील सदस्यांना लहान मुलांना सांभाळावे लागले. सातारा शहरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी शहरातील क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय, कन्याशाळा, अनंत इंग्लिश स्कूल, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय आदी ठिकाणच्या सुमारे १६ केंद्रांवर दोन टप्प्यांत ही परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात पाच हजार ४५ जणांनी परीक्षा दिली तर ४५७ जण गैरहजर होते. दुपारच्या सत्रात तीन हजार ९२५ जणांनी परीक्षा दिली. ३५५ जण अनुपस्थित होते. या परीक्षेसाठी चार भरारी पथके तयार करण्यात आली होती. परीक्षेसाठी सकाळच्या टप्प्यात १६ केंद्रसंचालक, एक उपकेंद्र संचालक, ४० पर्यवेक्षक, २२१ समवेक्षक, ३० लिपिक, ५८ शिपाई कार्यरत होते. दुपारच्या टप्प्यासाठी १३ केंद्रसंचालक ३१ पर्यवेक्षक, १७३ समवेक्षक, २४ लिपिक, ४६ शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, दोन टप्प्यात झालेली टीईटीची परीक्षा सुरळीत झाली. कोठेही गैरप्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
नऊ हजार जणांनी दिली टीईटी परीक्षा सुरळीत
By admin | Updated: December 14, 2014 23:47 IST