प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड देशातील राज्यपाल अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने दिल्लीसह मुंबईचे वातावरण तापले आहे. मुंबई व दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे; पण त्यामुळे कऱ्हाडात मात्र भलतीच अस्वस्थता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्यापासून राज्याच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र नेतृत्वाची झूल कोणाच्या खांद्यावर ठेवायची, हाच पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न असल्याचे मानले जाते; पण गेल्या चार दिवसात नेतृत्व बदलाच्या घडामोडींना वेग आल्याने चव्हाणांच्या ‘होम पीच’वर भलतीच अस्वस्थता आहे. अशोकराव चव्हाणांचा ‘आदर्श’ घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अनपेक्षीतपणे केंद्रात राज्यमंत्री असणारे दुसरे चव्हाण मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रात ‘पृथ्वीराज’ सुरू झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्यानंतर सुमारे पन्नास वर्षांनी कऱ्हाडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यामुळे कऱ्हाडसह जिल्हावासियांना आनंद झाला. त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. गत ३ वर्षात पृथ्वीराजबाबांनी जिल्ह्यासह कऱ्हाडला ‘छप्पर फाडके’ निधी दिला आहे. अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे लोकांच्यात समाधानाचे वातावरण आहे. नुकताच ‘पालघर’ स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर ‘यशवंतरावांची’ कर्मभूमी असणाऱ्या कऱ्हाडला पृथ्वीराज चव्हाणच जिल्हा करतील अशी आशा आहे; पण मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याने कऱ्हाडकरांची धकधक वाढू लागली आहे. कऱ्हाडचे माजी खासदार श्रीनिवास पाटील सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले राज्यपाल होण्याची संधी त्यांना मिळाली; पण केंद्रात ‘भाजप’ सरकार आल्यानंतर राजकिय वचपा काढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यपाल बदलण्याच्या हालचाली ‘मोदी’ सरकारने सुरू केल्या आहेत. काहींनी राज्यपाल पदाचे राजिनामे दिले आहेत. तर काहींनी नकार दिला आहे. त्यात श्रीनिवास पाटील यांचे पदही अडचणीत असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमातून येत असल्याने कऱ्हाडसह जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतकांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
खलबते दिल्लीत ; अस्वस्थता कऱ्हाडात !
By admin | Updated: June 20, 2014 23:05 IST