खटाव : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालयाची शैक्षणिक जाळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आता मुलींना शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे; परंतु त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात स्थापन्यात आलेल्या लैंगिक अत्याचार कमिट्या पुन्हा एकदा चार्ज करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलींना आपल्या अडचणी तसेच असणाऱ्या तक्रारी निर्धास्तपणे मांडता यावी म्हणून महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या या कमिटीच्या माध्यमातून मुलींना मार्गदर्शन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शहर असो, वा ग्रामीण भाग सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे. त्यात कोणताही फरक दिसून येत नाही. आजही अनेक महाविद्यालयांच्या परिसरातील परिस्थिती बदलेली नाही. छेडाछेडीचे प्रकार वाढतच आहेत. काही महाविद्यालयांच्या कडक शिस्तीमुळे महाविद्यालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडत नाही, तसेच महाविद्यालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामुळे टवाळ मुले कोणताही अनूचित प्रकार करताना विचार करूनच आपली पावले उचलताना दिसून येत आहेत. परगावहून येणाऱ्या मुलींना अधिक त्रास सोसावा लागतो. बसस्थानकावर तर हमखास टवाळखोर बसलेले असतातच आणि आता तर फॅशनच सर्वत्र दिसून येते ती मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून मुलींच्यासमोर स्टाईल मारणे. मोबाईल ही गोष्ट आता सर्वांकडे असल्याने काहीवेळा मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्रास देण्याचे प्रकारही वाढले आहेत. मुलींच्या पालकांना आपली मुलगी सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत काळजी वाटते. (वार्ताहर)
लैंगिक अत्याचारविरोधी कमिट्यांची गरज
By admin | Updated: January 2, 2015 00:12 IST