सातारा : आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी चारशेहून अधिक कामांचे प्रस्ताव नियोजन समितीकडे दाखल केले आहेत. त्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. संबंधित कामे ज्या विभागामार्फत होणार आहेत, त्यांना आराखडे बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास ही कामे कोणत्याही क्षणी सुरू होणार आहेत.‘लोकमत’ने ‘आमदार निधीचा सातबारा’ या मालिकेच्या माध्यमातून कोणत्या आमदारांनी किती निधी खर्च केला आहे आणि कोणते आमदार मागे आहेत, याची माहिती पुढे आणल्यानंतर आमदारांच्या स्वीय सहायकांची आणि कार्यकर्त्यांची नियोजन समिती कार्यालयातील गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींना निरोप पाठवून आपल्या गावात कोणते काम हवे, याच्या मागणीचे ठराव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. २०१३-१४ चा निधी सर्वच आमदारांनी विविध विकासकामांवर टाकला असून, ती कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. २०१४-१५ साठी असणारा निधी आचारसंहितेपूर्वी विविध विकासकामांवर टाकावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे. जे चारशे प्रस्ताव दाखल झाले आहेत, त्यामध्ये आमदार प्रा. दीपक चव्हाण, सातारा-जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. विलासराव पाटील-उंडाळकर आणि आ. विक्रमसिंह पाटणकर यांची आघाडी आहे. आमदारांना प्रतिवर्षी स्थानिक विकासनिधी म्हणून दोन कोटी देण्यात येतात. हा निधी कार्यकर्ते तसेच गावांनी केलेली मागणी आणि ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर संबंधित कामांवर टाकला जातो.ही कामे प्रामुख्याने दहा लाखांपेक्षा अधिकची नसतात. उर्वरित कामे ही जिल्हा नियोजन आराखड्यातून केली जातात. (प्रतिनिधी)
आमदारांचे चारशेहून अधिक प्रस्ताव दाखल
By admin | Updated: July 27, 2014 22:28 IST