कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयनानगर भागात बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर कोयना धरणाच्या पाणीपातळीही काहीशी वाढ झाली आहे.
पाटण तालुक्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे लवकरच उरकली होती. तर जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने कोयना भागातील बहुतांशी भात, नाचणी पिकांचे तरवे पेरणी पूर्ण झाली होती. मध्यंतरी काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून पिकांसाठी पोषक ठरत आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा २८.७१ टीएमसी इतका झाला होता. तर धरणात पाण्याची आवक ३०७८ क्युसेक्सने सुरू होती. कोयनेला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५३ मिलिमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे ५८ मिलिमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर एक जूनपासून नवजा येथे २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंत ६१ तर आतापर्यंत ३८४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.