सातारा : केंद्रातील भाजपचे सरकार आता किमान वीस वर्षे तरी हलत नाही, हे कळून चुकल्यामुळे बरेच जण पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना स्वार्थापोटी आलेल्यांना पक्षाने वेळीच ओळखावे व निष्ठावंतांना संधी द्यावी, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार यांनी म्हटले आहे.सातारा-जावली मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १९८४ नंतर प्रथमच २०१४ मध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले. ही किमया नरेंद्र मोदी यांनी घडवून आणली. काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी वारंवार ‘मोदींची लाट नाही,’ असा कांगावा केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण देशातील व राज्यातील जनतेला या भ्रष््टाचारी व घोटाळेबाज सरकारचा कंटाळा व तिरस्कार आला आहे. त्यामुळे केंद्रात तर सत्ता आलीच आहे आणि आता राज्यातही येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात बेताल वक्तव्ये करण्यात आली. परंतु त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. जनता आता त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या अनुभवातून आता अनेक नेते भाजपचे गोडवे गाऊ लागले असल्याचे सांगून पवार यांनी म्हटले आहे की, भाजपला ‘जातीयवादी’ म्हणणाऱ्या अनेकांना याच पक्षातून आमदारकी, खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. केंद्रात जर भाजपची सत्ता आली नसती, तर आताचे हेच तथाकथित नेते भाजपमध्ये आले असते का? या मंडळींना सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. त्यांना आता कळून चुकले आहे की, केंद्रातील भाजप सरकार किमान २० वर्षे हलत नाही. त्यामुळेच आता बरेचजण पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्न करू लागले आहेत. परंतु पक्षाने त्यांना दूर ठेवून निष्ठावंतांना जवळ करावे. (प्रतिनिधी)सातारा-जावली मतदारसंघ भाजपकडेच ठेवण्याची मागणी आपण वरिष्ठांकडे केली असून, आयात आणि स्वार्थापोटी आलेल्यांना पक्षाने वेळीच ओळखून निष्ठावंतांनाच संधी द्यावी. बाहेरून येणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असेल, हे इच्छुकांनी लक्षात घ्यावे.- रवींद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
सत्तेला हपापलेल्यांना आता दूर ठेवा
By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST