नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्या दरम्यान टंचाई असतेच. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत ८० गावे आणि ४५० वाड्यांच्या घशाला कोरड पडलेली. पण, वळवाचा पाऊस धुवाॅंधार पडल्याने जिल्ह्यातील सर्वच टॅंकर मे महिन्यातच बंद झालेत. इतिहासात प्रथमच असे घडले आहे.
सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जिल्ह्यात टंचाई वाढते. त्यामुळे माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतील टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तर जादा पाऊस पडणाऱ्या तालुक्यांतही टंचाई जाणवते. गेल्यावर्षी तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झालेले. तरीही जिल्ह्यातील टंचाईला लवकर सुरूवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच टॅंकरने लोकांना पाणीपुरवठा सुरू झालेला. मात्र, आता हे चित्र बदलेले आहे. मागील १० दिवसांत वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे जिल्ह्यातील टॅंकर पूर्णपणे बंद झाले आहेत.
माणमध्ये ४९ गावे ३५७ वाड्यांना कोरड..
माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई होती. माणमधील ४९ गावे आणि ३५७ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. ५२ टॅंकरवरती ७१ हजार नागरिक आणि ५४ हजार पशुधनाची तहान अवलंबून होती. सध्या माण तालुक्यातच पावसाने उन्हाळ्यातच विक्रमी हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळ्यातच माणमधील टॅंकर बंद झाला. हा एक इतिहास घडला आहे.वाई, पाटण, खटाव, फलटण तालुक्यातील टंचाई संपली...
जिल्ह्यातील माणबरोबरच पाटण, वाई, कोरेगाव, खटाव, फलटण तालुक्यांत टॅंकर सुरू झाले होते. एकूण ८० गावे आणि ४५० वाड्यांतील १ लाख ६ हजार नागरिक आणि ६८ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा पुरवठा होत होता. पाटण तालुक्यात एक गाव आणि चार वाड्यांना टॅंकर सुरू होता. तर वाईत चार गावे आणि तीन वाड्या, कोरेगावमध्ये सात गावे, खटाव तालुक्यात १८ गावे आणि ८१ वाड्या, फलटणला एक गाव आणि पाच वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता.
७८ टँकर बंद...
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत ७८ टॅंकर टंचाई निवारणासाठी धावत होते. यामधील शासकीय ५ तर खासगी ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण, आता हे सर्व टॅंकर बंद झाले आहेत.