महाबळेश्वर : जंगलांचे रक्षण व्हावे, यासाठी वन विभाग महाबळेश्वर व संयुक्त वन व्यवस्थापन समिती भेकवली यांच्या संयुक्त विद्यमाने भेकवली ग्रामस्थांना गरम पाणी करण्याच्या बंबाचे वितरण वनपाल एस. बी . भंडारे, एस. सी केळगणे, (अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती भेकवली), आर. टी .लोहार (वनरक्षक तथा सचिव भेकवली), सरपंच, एस. एम. केळगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनरक्षक ए .ए. मलप, एल.डी. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम वनखात्याच्या लिंगमाळा विश्रामगृहाच्या प्रांगणात झाला .महाबळेश्वर वन परिक्षेत्रातील वृक्षतोड कमी व्हावी तसेच येथील वनांचे, वन्यजीव व वन्यसंपत्तीचे रक्षण व्हावे, यासाठी एन. आर . प्रवीण, उपवनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना राबवित असताना वनाचे रक्षण होईल व स्थानिकांचीही गरज भागेल या गोष्टींचा विचार केला जात आहे. अंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी वृक्षतोड न करता खाली पडलेल्या पाला पाचोळा, वाळक्या काटक्या, सुका कचरा यावर पेटविता येणाऱ्या गरम पाण्याचे बंब यापैकी एक असून, याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी एस. बी . भंडारे यांनी केले. भेकावल ग्रामस्थांना या बंबाचे वाटप करण्यात आले. भविष्यात संपूर्ण गावच सरपणमुक्त करणार असल्याचा विश्वास एस. सी. केळगणे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
जळणाविना झटपट गरम पाणी!
By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST