खंडाळा : कोरडे डोळे, कोरडे आभाळ, भेगाळलेली धरती...गर्जत ये घनश्यामा, कर धरणीची स्वप्नपूर्ती..! दुष्काळाचे सावट, पाणीटंचाईची भीषण समस्या, यामुळे कंबरडे मोडले आहे. वाळलेली पिके आणि भेगाळलेल्या जमिनी अशी सर्वत्र विदारक परिस्थिती पाहायला मिळते. माणसांबरोबरच मुक्या जनावरांचाही जीव कासावीस झाला आहे. कुठुनतरी पाऊस बरसावा आणि तृष्णा भागावी. अशावेळी ढगांना बांधून खेचता आलं तर अशी अपेक्षा शेतकरी करीत असताना मेघराजा आता बरसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा चित्राच्या माध्यमातून मांडून खंडाळ्यातील स्वप्नील पवार आणि रवींद्र पवार या बंधूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. समाजप्रबोधनात्मक अनेक विषयांवर विविधांगी उपदेश देणारी चित्रे बनवून सोशल मीडियावर ती लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. स्वप्नील पवार हे व्यवसायाने फोटोग्राफर तर रवींद्र पवार हे सर्पमित्र, प्राणीमित्र म्हणून ओळखले जातात. सध्या स्वत:चेच फोटो काढून सोशल मीडियावर वाहवा मिळविण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. अशावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक चित्रे बनवून ती प्रसारीत करण्याची कल्पना पवार बंधूंना सूचली. त्यामधून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रांची निर्मिती झाली. बोलण्यापेक्षा कृतीतून समाजाला दिशा देण्याचा हा प्रयत्न इतरांना प्रोत्साहन देणारा आहे. (प्रतिनिधी) प्राण्यांविषयी लहानपणापासून लळा आहे. त्यातूनच फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. याच कलेतून सामाजिक ज्वलंत विषयावर समाजप्रबोधन करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. प्राणी-पक्ष्यांविषयी माहितीपर पुस्तिका तयार करून ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. - रवींद्र पवार, प्राणीमित्र
पावसासाठी ढगांना दोरीनं बांधून खेचता आलं तर !
By admin | Updated: June 6, 2016 00:42 IST