सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

By नितीन काळेल | Published: May 11, 2024 07:09 PM2024-05-11T19:09:19+5:302024-05-11T19:09:59+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसने सर्वाधिक वेळा केले नेतृत्व

If Udayanraje Bhosle wins from Satara Lok Sabha constituency this year, he will be equal to Yashwantrao Chavan in getting elected | सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

सातारा लोकसभा मतदारसंघात यशवंतराव यांचा चौकार; यंदा उदयनराजे बरोबरी साधणार..? 

नितीन काळेल

सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत १८ सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले. तर ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. तर लक्ष्मणराव पाटील यांनी दोनवेळा तर इतर पाचजणांनी एकदा सातारा लोकसभेचे नेतृत्व केले आहे. आताच्या निवडणुकीत उदयनराजेंनी बाजी मारली तर यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीत ते येणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे आतापर्यंत दिग्गजांनी नेतृत्व केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, क्रांतिसिंह नाना पाटील आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर दिग्गजांनीही सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून आपला ठसा उमटवला आहे. या मतदारसंघावर अधिक करून काॅंग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा क्रमांक लागतो. तर शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीनेही एकदा विजय मिळविलेला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ ला प्रथम लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये लोकसभेच्या सातारा उत्तर मतदारसंघातून गणेश अळतेकर यांनी विजय मिळवला होता. पहिल्याच निवडणुकीत काॅंग्रेसला यश मिळाले. मात्र, दुसऱ्या १९५७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मतदारसंघावर झेंड फडकवला. काॅंग्रेसचे उमेदवार अळतेकर यांना दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. असे असलेतरी १९६२ च्या तिसऱ्या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांना साताऱ्यावर कब्जा करता आला नाही. देशभक्त किसन वीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा काॅंग्रेसचा झेंडा रोवला गेला.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव चव्हाण प्रथमच सातारा मतदारसंघात उभे राहिले आणि विजयही झाले. यानंतर १९८० पर्यंतच्या इतर तीन निवडणुकांतही यशवंतराव चव्हाण विजयी झाले. चव्हाण यांनी देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ते उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. तसेच सातारा मतदारसंघ काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिला. १९८४ मध्ये चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर १९८४ च्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रतापराव भोसले हे काॅंग्रेसकडून रिंगणात उतरले आणि विजयही मिळवला. त्यानंतर १९८९ आणि ९१ च्या निवडणुकीतही भोसले काॅंग्रेसकडून विजयी झाले.

मात्र, याच काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. अशा काळातच १९९६ ला लोकसभा निवडणूक झाली. यामध्ये हिंदुराव नाईक-निंबाळकर विजयी झाले आणि मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांचा पराभव झाला. त्यानंतर भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, १९९८ ला काॅंग्रेसकडून अभयसिंहराजे भोसले निवडणुकीत उतरले आणि विजयही मिळवला.

१९९९ ला शरद पवार हे राष्ट्रीय काॅंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील निवडून आले, तर शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर दुसऱ्या तर राष्ट्रीय काॅंग्रेसचे उमेदवार दादाराजे खर्डेकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २००४ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी दुसऱ्यावेळी विजय मिळविला. यावेळी शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झालेला. २००९ पासून २०१९ पर्यंतच्या तीन निवडणुका या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून जिंकल्या. तसेच हॅट्ट्रिकही साधली.

मात्र, निवडणुकीनंतर चारच महिन्यात उदयनराजेंनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने कब्जा केला. श्रीनिवास पाटील खासदार झाले. तर उदयनराजेंचा पराभव झाला. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक ही १८ वी आहे. या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे रिंगणात होते. उदयनराजे विजयी झाले तर ते चाैकार ठोकणार आहेत. तर शशिकांत शिंदे विजयी झाल्यास त्यांचा संसदेत प्रथमच प्रवेश होणार आहे.

काॅंग्रेस १० तर राष्ट्रवादी ५ वेळा विजयी..

सातारा लोकसभेसाठी आतापर्यंत १८ वेळा सार्वत्रिक तर एकदा पोटनिवडणूक झाली आहे. आताच्या २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जानेवारीला लागणार आहे. तरीही आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅंग्रेसने सर्वाधिक १० वेळा सातारा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. तर राष्ट्रवादीने पाचवेळा विजय मिळवलाय. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेनेने एकदा सातारा मतदारसंघात एकदा झेंडा फडकवला आहे. गेल्या २० वर्षात सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आताच्या या निवडणुकीत हा बालेकिल्ला शाबूत राहतो की याला भगदाड पडते हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: If Udayanraje Bhosle wins from Satara Lok Sabha constituency this year, he will be equal to Yashwantrao Chavan in getting elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.