कऱ्हाड : येथील बसस्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील रस्त्याकडेला चायनीज, वडापाव तसेच फळविक्रेते व साहित्य विके्त्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहेत. कऱ्हाड पालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढलेल्या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुररूती करण्याची मागणी होत आहे.
ढेबेवाडी फाटा चौकात वाहतुकीचा बोजवारा
मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. ढेबेवाडीफाटा हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वडाप वाहनेही याचठिकाणी थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तांबवे फाट्यापासून रस्त्याची अवस्था दयनीय
तांबवे : तांबवे फाटा ते तांबवेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता धोकादायक बनला आहे. तांबवे येथे नवीन पूल सुरू करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यावर संबंधित ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. सध्या खडी उखडून पूर्वीपेक्षा मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकात स्वच्छतागृह बंद असल्यामुळे गैरसोय
उंब्रज : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृह गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांसह परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे बसस्थानकावरील स्वच्छतागृह कुलूपबंद होते. आता एसटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची बसस्थानकात ये-जा सुरू झाली आहे. कुलूपबंद असलेले स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारींचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटाविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने, तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.