रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड ग्रामपंचायत, माझी वसुंधरा अभियान, ग्रामकृती गट समिती आणि या अभियानासाठी नियुक्त स्वयंसेवी संस्था म्हणून ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय आणि प्राथमिक शाळा अशा तीन ठिकाणी हरित शपथ घेण्यात आली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, प्रकल्प समन्वयक बाजीराव पाटील, कृष्णा महाविद्यालयाचे डॉ. प्रा. स्नेहल राजहंस, डॉ. प्रा. व्ही. के. सोनवणे, तलाठी प्रशांत पाटील, मुख्याध्यापिका सुजाता पवार आदींनी सहभाग घेतला.
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्णयानुसार पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात रेठरे ग्रामपंचायतीचा सहभाग असून वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून गावातील लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवित कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत शपथ घेतली.
- चौकट
वृक्षसंगोपन, सौरऊर्जा वापराचा निर्धार
पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे पालन करीन, मी माझे घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवीन, घरातील ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करेन, मी उपलब्ध सर्व ठिकाणी वृक्षलागवड करेन व त्यांचे संगोपन करेन, पारंपरिक ऊर्जेचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जेचा वापर करेन, घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवून भूजलाच्या वाढीस मदत करेन, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
फोटो : ०६केआरडी०३
कॅप्शन : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी हरित शपथ घेतली.