खंंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खंडाळ्याची निवडणूक रणधुमाळी रंगू लागली आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेवक यादीत आपली वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, प्रभागासाठी आरक्षण आपल्या पथ्यावर पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. त्यामुळे सर्वांना प्रभाग रचनेचे वेध लागले आहेत. तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या खंडाळा नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पटलावर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. खंडाळा येथील प्रभाग रचनेचा प्रारूप प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासक शिवाजीराव तळपे यांनी सादर केला आहे. यामध्ये नवीन नगरपंचायतीत १७ नगरसेवक निवडून दिले जाणार असून, यामध्ये ९ महिला व ८ पुरुष असणार आहेत. ४ जुलैपर्यंत प्रभाग रचना निश्चित करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असल्याने प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. प्रभागांची संख्या आणि जातीनिहाय आरक्षणे निश्चित झाली असून, प्रभागांचा भौगोलिक आराखडा निश्चित होणे बाकी आहे. खंडाळ्यातील मुळचे ५ वॉर्डमध्ये १७ प्रभाग बनवले जाणार आहेत. याची सुरुवात उत्तरेकडून पूर्व व दक्षिण अशी होणार आहे. त्यामुळे आपल्याला सोयीस्कर प्रभाग व्हावा, अशी अपेक्षा बाळगून अनेकजण कामाला लागले आहेत. प्रभाग रचनेनंतर तेथील मतदार संख्येवरून आरक्षणे पडणार आहेत. ८ जुलैपर्यंत प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर १४ जुलैपर्यंत आरक्षण सोडत होणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणूक हालचाली गतिमान होत असताना राजकीय पटलावरही प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत कामकाजाने वेग घेतल्याचे दिसत आहे. अनेक वर्षे सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसची दुसरी फळी निवडणुकीत सक्रिय झाली आहे. नियोजित प्रभागानुसार लोकांच्या भेटीगाठी घेऊन आजवर केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. सकाळी व सायंकाळी लोकांच्या वेळेनुसार घरभेटी घेऊन पक्षाची बाजू मजबूत केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनेही खंडाळा नगरपंचायतीसाठी कंबर कसली असून, चौकाचौकांमध्ये कार्यकर्त्यांची सल्लामसलत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खंडाळ्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कलगीतुरा जगजाहीर आहे. कोणत्याही गोष्टीवरून श्रेयवादाचे राजकारण येथे घडताना वारंवार पाहायला मिळते. याच गोष्टीचा फायदा उठवून शिवसेना आणि भाजपा यांनी आपले बस्तान पक्के करण्यावर भर दिला आहे. तर रिपब्लिकन पक्षाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी) तिसऱ्या आघाडीला खतपाणी खंडाळ्यात यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच जोरदार लढाई झाली आहे. मात्र, नगरपंचायतीचे व्यासपीठ हे वेगळ्या धर्तीवर मानले जाते. एका प्रभागातून एकालाच संधी असल्याने ज्याचे काम जनमाणसात चांगले आहे त्याला नगरसेवकपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे प्रभागरचनेनंतर शिवसेना आणि भाजपा यांची ताकद एकटवून अंतर्गत नाराजांना बरोबर घेऊन सक्षम तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचालीही पडद्यामागून सुरू आहेत. असा प्रयोग झाल्यास निवडणूक वेगळ्या धर्तीवर होण्याची दाट शक्यता आहे.
प्रभाग आरक्षणासाठी ‘अनेकांचे देव पाण्यात’
By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST