सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अवतीभोवती अतिक्रमणाचा विळखा पडला असून, हे अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. अतिक्रमणांमुळे रुग्णांचाही जीव अक्षरश: गुदमरतोय.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रोज आठशे ते नऊशे रुग्ण तपासणीसाठी येत असतात. तितकेच रुग्ण रुग्णालयात दाखलही होत असतात. सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार होत असल्यामुळे रुग्णांचा ओढा या ठिकाणी सर्वाधिक असतो. हेच हेरून अनेक व्यावसायिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अवतीभोवती अतिक्रमण केले आहे. ही अतिक्रमणे भविष्यात रुग्णालयाला मोठी अडचण ठरणार आहेत. काही ठिकाणी अवैध प्रकारही सुरू असतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवितासही धोका संभावू शकतो. खरं तर रुग्णालयाच्या चाेहोबाजूंनी स्वतंत्र आणि मोकळी जागा असायला हवी. जेणेकरून रुग्णांना स्वच्छ हवा घेता यावी. त्यांच्या आरोग्यावर बाहेरच्या गाेंगाटाचा कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; मात्र याचा कोणीही विचार करत नाही. अनेकदा कर्कश हाॅर्न वाजवत वाहन चालक रुग्णालयासमोरून निघून जातात. काहीजण तर रुग्णालयाबाहेर गाड्या उभ्या करून विनाकारण हाॅर्न वाजवत असतात. त्यामुळे रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रुग्णवाहिका सुसाट येत असतात. अशावेळी रुग्णालयाच्या भोवती असलेले अतिक्रमण वाहनांना अडथळा ठरू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे काढून हा परिसर स्वच्छ आणि मोकळा करणे गरजेचे आहे. शहरातील खासगी हाॅस्पिटलचीही हीच परिस्थिती आहे. दाटीवाटीमध्ये ही हाॅस्पिटल्स् उभारण्यात आली आहेत. त्यामुळे या हाॅस्पिटलचाही जीव गुदमरतोय.
n आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना बाहेर येण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तीन दरवाजे आहेत; मात्र वरच्या मजल्यावरून तत्काळ खाली येण्यासाठी जिन्यांशिवाय पर्याय नाही. अनुचित घटना घडली तर तळमजल्यावरील रुग्ण तत्काळ बाहेर येऊ शकतात. परंतु असा प्रसंग सिव्हिलमध्ये एकदाही घडला नाही.
जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत एकवेळ झाले मॉकड्रिल
आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असावी म्हणून पोलीस दलातर्फे सुमारे नऊ वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात केवळ एकदाच माॅकड्रिल झाले आहे. त्यानंतर मात्र झाले नाही.