सातारा : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीचे पीक पडले आहे. तसेच डाळिंब, द्राक्षबागांनाही फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा फटका अधिक करून दुष्काळी भागात अधिक आहे. येथील शेतकऱ्यांनी विदर्भाप्रमाणे नुकसान भरपाई पॅकेज घ्यावे, अशी मागणी केली आहे.औंध : मागील दोन दिवसांमध्ये औंध परिसरातील उत्तरेकडील गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा, गहू पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील उत्पादित कडधान्ये, शेती मालांचे दर कोलमडले असतानाच आता अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पॅकेज देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी खटाव तालुक्यातील अंभेरी, कोकराळे, भोसरे, चौकीचा आंबा, वरुड, सिद्धेश्वर कुरोली, जायगाव, आंमलेवाडी, गादेवाडी, जाखणगाव आदी गावांना अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यांनी झोडपून काढल्याने शेतामधील ज्वारीची पिके भुईसपाट झाली. हरभरा, गहू, बटाटा पिकांना ही याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील लाखो रुपयांचे पीक उत्पादनाला याचा मोठा फटका बसला आहे. खते, बी-बियाणे औषधांचा लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. त्याचबरोबर गुरुवारी व शुक्रवारी औंध परिसरातही पाऊस, धुके, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने या भागात ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोसाव्याचीवाडी, खरशिंगे, गोपूज, पळशी परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. शेतामध्येच ज्वारीची पिके भुईसपाट झाल्याने यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बटाटा, कांदा, वाटाणा या पिकांना ही याचा मोठा फटका बसल्याची शक्यता आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली जात आहे.कुडाळ : जावळीतील शेतकऱ्यांनी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, पिके अत्यंत कष्टाने घेतली आहेत. मात्र, शुक्रवारी तालुक्याच्या मेढा, पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह सुमारे दीड तास पडलेल्या पावसाने या शेतीपिकांचे मोठे नुकसान केले तर आंब्यावरदेखील या पावसाचा फटका बसलेला दिसतो. भणंग, मेढा परिसरात तब्बल दीड तास पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांचे नुकसान केले.रब्बी हंगामातील पिकांची चांगलीच वाढ झालेली असताना या अचानक आलेल्या पावसाने पिकांवर परिणाम झाला. ज्वारी, गहू हरभरा या पिकांना चांगलाच फटका बसला तर ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांवर देखील घाटी अळी प्रादूर्भाव होण्याची चिन्हे दिसत आहेत, तर पावसाचा काही प्रमाणात फटका स्ट्रॉबेरी पिकांनाही बसला आहे. वाठार स्टेशन : सलग दोन दिवस पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ज्वारी, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या पिकांची कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा शेती व्यवस्थेवर परिणाम होत आहे. हरभरा, गहू या पिकांसाठी पोषक थंडीची गरज असताना थंडी गायब झाली आहे. यातच दोन दिवस वादळी वारे व पडलेल्या गारपीठ पावसाने कोरेगावच्या उत्तर भागातील तडवळे (सं.) वाघोली, भावेनगर, पिंपोडे बु।। परिसरातील शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसाने ज्वारीचे पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे ही पिके हातातून जाण्याचीच भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. (प्रतिनिधी)द्राक्ष, स्ट्रॉबेरीलाही फटकापिंपोडे बुद्रुक : अवकाळी पावसाने राज्यभर थैमान घातलेले असताना गेल्या दोन दिवसांपासून पिंपोडे बुद्रुक आणि परिसरात अवकाळी पाऊस पडत असून, जोराच्या वाऱ्यामुळे रब्बी ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. सततच्या ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे हरभरा आणि गहू या पिकांवरही किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. उत्तर कोरेगाव परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडत असून, त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. वाघोली, सोनके, पिंपोडे बुद्रुक, सर्कलवाडी, चौधरवाडी आदी गावांमध्ये द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीसारखी भांडवली पिके आहेत. त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पाऊस अन् वारा असल्यामुळे बहरात असलेले ज्वारीचे पीक मात्र पूर्णपणे भुईसपाट झाल्याचे दिसत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले आहे. रब्बी ज्वारी वर्षभरासाठी धान्य म्हणून वापरता येते. त्याचबरोबर ज्वारीची वैरणही शेतकरी जनावरांसाठी सुका चारा म्हणून साठवण करून ठेवत असतो. आता मात्र ज्वारीचे पीक हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारीचे उभे पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. उत्पन्नात घट आली तर शेतकरी सोसू शकतो. मात्र, पीक वाया गेले तर मात्र सोसण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे आवश्यक ती मदत शासनाकडून मिळणे गरजेचे आहे.- कमलाकर भोईटे, शेतकरी तडवळे सं. वाघोली
सातारचा शेतकरी दुष्काळातून गारपिटीत
By admin | Updated: December 14, 2014 23:46 IST