वाठार स्टेशन : हवाई दलात नोकरी केल्यानंतर गावाकडे जायचं. शेती करायची अन् शेतकऱ्यांसाठी एखादी नर्सरी काढून मस्त जगायचं, असं छान स्वप्न उराशी बाळगून गेली १२ वर्षांपासून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक या गावी शेती करत असलेले सेवानिवृत जवान कांतिलाल खाशाबा केंजळे (वय ५५ ) व शेतमजूर विकास मनजी सारोळे (४५) या दोघांचा एका विहिरीने बळी घेतला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली. स्वत:च्या बांधीव विहिरीत पडलेला बोगदा मुजवण्यासाठी लावलेला पत्रा काढत असताना हादरा बसून विहिरीस बांधलेला कमजोर स्लॅब व मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली अडकून या माजी जवानासह त्यांच्याकडे शेती करत असलेल्या एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना रविवारी घडला आणि ढिगाऱ्याखालून सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीत पडलेल्या ढिगाऱ्याखालील मृतदेह शोधण्यासाठी तब्बल १२ तास ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने रात्री ३ वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होते.याबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील येळे वस्तीनजीक पाडळ वाट शिवारात येथील कांतिलाल केंजळे यांची स्वत:ची ७० फूट खोल बांधीव विहिर आहे. या विहिरीचे अंदाजे दीड वर्षांपूर्वीच ५० फूट सिमेंट रिंग टाकून बांधकाम केले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच विहिरीतील एका रिंगला चार ते पाच फुटांचा बोगदा पडल्यामुळे कांतिलाल केंजळे यांनी हा बोगदा लोखंडी पत्र्याच्या साह्याने लोखंडी अँगलच्या मदतीने वेल्डिंग करून बसवला होता. मात्र, यातूनही बाहेरील माती विहिरीत पडत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी एका बांधकाम ठेकेदाराला हा बोगदा दाखवला होता. यावेळी या बांधकाम ठेकदाराने विहिरीतील बोगद्यावर लावलेला पत्रा काढून घ्या, असे कांतिलाल यांना सांगितले होते. त्यामुळे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी कांतिलाल व त्यांच्याकडे काम करत असलेला शेतमजूर दुपारी २ वाजता या विहिरीकडे गेले होते. यावेळी विहिरीच्या वरील बाजूस एक पार ठोकून त्यास एक दोरी बांधून कांतिलाल हे विहिरीतील मधोमध असलेल्या बोगद्यावरील पत्रा काढत होते. याच दरम्यान हादरा बसत असल्याने कमकुवत असलेली विहिरीतील रिंग अचानक कोसळली. यावेळी विहिरीवरील बाजूस दोर धरून बसलेला मजूरही यामुळे खाली कोसळल्याने अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणाऱ्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी मातीचा मोठा ढीग विहिरीत कोसळला गेल्याचे व ढिगाऱ्याखाली कांतिलाल व त्यांचा शेतमजूर अडक ला असल्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. याबाबतची माहिती संजय साळुंखे यांनी तत्काळ वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून या ठिकाणी ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने विहिरीबाहेर समतल खड्डा काढून विहिरीतिल मातीचा ढिगारा हटवण्याचे काम या मशिनच्या साह्याने पहाटे ३ पर्यंत सुरू होते. पहाटे ३ वाजता दोन्ही मृतदेह आढळून आल्यानंतर हे शोधकार्य थांबवून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. सोमवारी सकाळी दहा वाजता कांतिलाल केंजळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
माजी सैनिकाचा स्वत:च्या विहिरीने घेतला बळी
By admin | Updated: January 9, 2017 22:29 IST