सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पश्चिमेकडील प्रमुख ६ धरणांमध्ये ४५.०८ टीमएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षीही आतापासून चांगला पाऊस सुरू झाल्यास धरणे लवकरच भरू शकतात. तर सध्या कोयनेत २९, उरमोडीत ६, धोम ५ तर तारळी धरणात ३ टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हरफुल्ल होत आहेत. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून अनेक वेळा पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नदीपात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावांत आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. आताही पावसाळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण, काही भागांत पाऊस अत्यल्प पडलेला आहे. परिणामी पेरण्या रखडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे तलाव, धरणांत पाणीसाठा वाढू शकतो. तसेच धरणे लवकर भरली जातील, असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी या वेळी या धरणात ४९.३८ टीएमसी पाणीसाठा होता. तर या वर्षी तो ४५.०८ टीएमसी इतका आहे. त्यामुळे अजूनही पाणीसाठा बऱ्यापैकी टिकून आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणातही अजूनही २८.७१ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास २७.२८ टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)
धरणे या वर्षी गतवर्षी एकूण क्षमता यावर्षीची टक्केवारी
धोम ४.९५ ५.४९ १३.५० ३६.६७
कण्हेर २.१८ २.१७ १०.१० २१.५९
कोयना २८.७१ ३२.७० १०५.२५ २७.२८
बलकवडी ०.७० १.०७ ४.०८ १७.१०
उरमोडी ५.७४ ५.७५ ९.९६ ५७.२७
तारळी २.८० २.२० ५.८५ ४७.९२
....................................................