वडूज : ‘लोकसभा निवडणूक ही कार्यकर्ते व आपणाला अंर्तमुख करणारी ठरली आहे. येथील पाणीयोजना कोणत्या नदीवर आहेत, हे माहीत नसणाऱ्यांनी येथे निवडणूक लढविली. पंचवीस वर्षे राजकारणापलीकडे जाऊन या भागात कामे केली तरी लोकसभेत आम्ही काठावर पास झालो आहोत,’ अशी खंत राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक -निंबाळकर यांनी व्यक्त केली. येथील बचत सभागृहात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, माजी आमदार सदाशिव पोळ, अनिल देसाई, सभापती सोनाली खैरमोडे, सभापती श्रीराम पाटील, अॅड. भास्करराव गुंडगे, उपसभापती पिंटू जगताप, नंदकुमार मोरे, काकासाहेब मोरे, हिंदुराव गोडसे, विलासराव माने, कविता म्हेत्रे, सतीश फडतरे, मानसिंग माळवे, सुनंदा राऊत, डॉ. प्रशांत गोडसे, शशिकला देशमुख, भाग्यश्री भाग्यवंत, प्रा. अर्जुन खाडे, जितेंद्र पवार, धनाजी पवाशे उपस्थित होते. नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘जातीवादाचे राजकारण करून पश्चिम महाराष्ट्रातील जातीयतेढ निर्माण करू नका, आमच्यासोबत सर्व जातीधर्मांतील लोक आहेत. सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना भडकविले जात आहे. आघाडीतील सहकारी पक्षच आम्हाला शत्रू मानत असेल तर येथून पुढील काळात सहकारी पक्षाची कुबडी घेऊन निवडणुका होणार नाहीत. आमच्या पक्षातील मंत्र्यांमुळेच राज्याचा विकास झाला. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावधगिरी बाळगावी.’ सत्काराला प्रतिउत्तर देताना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘सत्कार हे निमित्त असून, मला या भागातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधावयाचा होता. गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा, विदर्भच्या अनुशेषाचा मुद्दा गाजत आहे. त्या कारणाने पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रश्न रखडले आहेत.’ उपसभापती नाना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. हणमंतराव शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास आ. प्रभाकर घार्गे, सुहास राजमाने, सोन्या जाधव, तानाजी पवार, अप्पासाहेब गोडसे, बाबासाहेब घार्गे, एस. पी. देशमुख, रामभाऊ खाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पंचवीस वर्षे कामे करूनही लोकसभेत आम्ही काठावर पास
By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST