पाचवड : ‘महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांप्रती नवनवीन योजना आणून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सजग करीत आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा राज्य शासनाच्या महसूल विभागाचा प्रामाणिक हेतू आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नोंदणी सुलभरीत्या करता येणार असून, हे परिपूर्ण ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून, त्याचा वापर सर्वच शेतकऱ्यांनी करावा,’ असे आवाहन वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी वाईचे तहसीलदार रणजित भोसले, कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
रणजित भोसले म्हणाले, ‘ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांची शेतीची अद्ययावत माहिती शासन दरबारी पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. एका मोबाइलवर वीस शेतकऱ्यांच्या माहितीची नोंद करता येणार आहे.’ या ॲपद्वारे शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत, याची विस्तृत माहिती यावेळी उपस्थितांना दिली. शासनाने हाती घेतलेल्या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व शासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.
मंडळ अधिकारी सचिन जाधव यांनी ई-पीक पाहणी ॲपची माहिती प्रात्यक्षिकासह उपस्थितांना दिली. यावेळी तलाठी सीमा साबणे, शीतल अडसूळ, अंबट वाड, अमोल कुंभार, महेश सुतार, विलास खरात, ऊस विकास अधिकारी अशोक ढमाळ, इन्चार्ज हॉर्टिकल्चर विशाल सावंत, शीला जाधव शिंदे, शेती विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याच्या ऊस विकास समितीचे अध्यक्ष व संचालक चंद्रकांत इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. ॲग्री मॅनेजर विठ्ठल कदम यांनी प्रास्ताविक केले, तर सेक्रेटरी एन. एन. काळोखे यांनी आभार मानले.
१०पाचवड
किसन वीर कारखाना कार्यस्थळावर राज्य शासनाच्या ई-पीकची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.