वाई : वाईच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, ओढे, घरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बलकवडी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव आणि गोळेवाडी गावातील कुटुंबांचे महाबळेश्वरच्या डोंगरावर तसेच परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. परिसरातील दहा फुटी रुंद ओढ्याचे पात्र शंभर फूट रुंद झाले.
या परिसरातील शेती, घरे व रस्ते पुलांचे मोठे नुकसान झाले. जागोजागी झालेल्या भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याची गरज ओळखून गोळेगाव आणि गोळेवाडीचे उपसरपंच जितेंद्र गोळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गोळे यांनी प्रशासन, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद दिला. गोळेवाडी आणि गोळेगावामध्ये बाविचावाडा, जननी ओढा, रांजण ओढा, कृष्णाबाई नदी हे चार महत्त्वाचे पूल वाहून गेले होते.
आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रम डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभागाचे अभियंते अमर काशीद, येरेकर यांच्या सहकार्याने तीन पुलावर तात्पुरत्या स्वरूपाचे वाहन ये-जा करण्यासाठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. रस्त्यामधील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळून शेतात आल्यामुळे अनेक एकर भात शेतीचे नुकसान झाल्याने जमीन नापीक झाली आहे. डोंगरामधील ग्रॅव्हिटीच्या पिण्याच्या पाण्याचे लाईन तुटून गेल्या आहेत. गोळेवाडीमध्ये घराची एक भिंत पडल्यामुळे शेळीचा मृत्यू झाला आहे.
चौकट
पाणी योजना सुरू करण्याबाबत सूचना
आमदार मकरंद पाटील, उपसभापती विक्रांत डोंगरे, धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या सहकार्यामुळे गोळेगावपर्यंत जाण्यासाठी चार ते पाच दिवसांमध्ये रस्ता तयार करून पूर्व पदावर आणण्याचे काम सुरू आहे. आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्याची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजना कशा सुरू करता येतील. पर्यायी व्यवस्था काय करता येईल याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम भागातील पावसाच्या अतिवृष्टीमुळे ज्या गावांची ग्रॅव्हिटी जलवाहिनी नुकसानग्रस्त झाली त्या गोळेवाडी, गोळेगाव यांचे तातडीने पाणी कसे चालू करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
प्रतिक्रिया
आरसीसी पूल केल्यास कायमस्वरूपी उपाय
अलीकडच्या वर्षांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. भूस्खलनच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशावेळी नदीचे पूल तग धरू शकत नाहीत. पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे पडलेले पूल आरसीसी कमानीचे केल्यास कायमस्वरूपीची उपाययोजना होईल, तसेच संभाव्य नुकसान टाळू शकते, अशी माहिती गोळेगाव येथील उपसरपंच जितेंद्र गोळे यांनी दिली.
१३वाई-रेन
वाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.