कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. ते त्वरित थांबवावे. वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळेल. सोमवारी (दि. २२) कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिला.
पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात रात्रंदिन शेतात राबून जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला तो संकटात असताना राज्य व केंद्र सरकार मदत करायची सोडून वीज कनेक्शन तोडून अंधाराचे बक्षीस देत आहे, तर त्यांची पिके वाळविण्याचे पाप करीत आहे.
केंद्र सरकार शेतकरी विरोधात कायदे करून शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार संकटातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. तरी राज्य सरकारने वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, तोडलेले त्वरित जोडावे. कर्नाटकप्रमाणे शेतीपंपासाठी दिवसा मोफत वीज देण्याचे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना २२ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.