सातारा : ‘सह्याद्रीच्या डोंगर रांगातील जनतेचे पायाभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबतच्या स्थानिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोयना नदीवर संगमनगर धक्का (ता. पाटण) येथे नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, सत्यजित पाटणकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘पाटण तालुक्यात पावसाला चांगला प्रारंभ झाला आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र, राज्याच्या बऱ्याच भागात अद्यापही पावसाअभावी टंचाईचे संकट समोर आहे. भविष्यात पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. ऊस शेतीसाठी शंभर टक्के ठिबक सिंंचनाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. कोयना धरणाच्या दोन्ही बाजंूकडून डोंगराच्या कडेने बंद पाईपलाईने कऱ्हाडपर्यंत सिंंचनासाठी पाणी नेण्याची आमदार पाटणकर यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी आश्वासक वक्तव्य केले.’ सह्याद्रीच्या डोंगर रांगातील दुर्मिळ तसेच औषधी वनस्पतींचे जतन झाले पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याचे सांगून पवार म्हणाले, मात्र ज्या स्थानिक जंगलवासियांनी जंगल जपण्याचे काम केले. त्यांच्या हक्कांनाही बाधा येता कामा नये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्याबाबतीत वनखात्याच्या बंधनांचा विचार करताना स्थानिकांचाही काही बाबतीत सवलतीच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. त्यासाठी व्यवहारीक भूमिका घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असेही ते म्हणाले. आमदार पाटणकर म्हणाले, ‘पावसाळ्यात पूर्वी तीन-चार महिने येथील जुन्या पुलावर पाणी राहत असल्यामुळे संपर्क तुटण्याचा प्रसंग वारंवार येत असे. आता या नवीन पुलाचे काम झाल्यानंतर ही अडचण येणार नाही. अशा प्रकारे पुढील ५० वर्षांचा विचार करुन पुलाचा आराखडा केला आहे. कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंत दोन्ही बाजूंनी बंद पाईपलाईने गुरुत्व पद्धतीने शेतीसाठी ठिकठिकाणी व्हॉल्व काढून पाणी दिल्यास नदीवरील लोकांच्या उपसासिंंचन योजनांचा विजेचा खर्च वाचेल. ’ यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार रवि सबनीस, गटविकास अधिकारी ए.ए. फडतरे, जे. एस. मोहिते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
३२ गावांचा प्रश्न मिटला ‘पूल मंजुरीबाबत प्रशासकीय मार्ग काढून या पुलासाठी सुमारे साडेबारा कोटींचा निधी मंजूर केला आहे. संगमनगरच्या पलीकडील सुमारे ३२ गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वच घटकांचा यामुळे लाभ होणार आहे. शेतीसह व्यापारालाही चालना मिळून आर्थिक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.’