कऱ्हाड ते वडोली निळेश्वर गावाचे अंतर आठ किलोमीटर असून या मार्गावरील एसटी गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह त्याचा त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. कऱ्हाड ते वडोली निळेश्वर एसटी दिवसातून आठ ते दहा फेऱ्या करत होती. कऱ्हाड, विद्यानगर, कोपर्डे हवेली, उत्तर पार्ले, वडोली निळेश्वर आदी मार्गाने ही एसटी मार्गस्थ होत होती. त्यामुळे एसटीला कायमच प्रवाशांची गर्दी असायची. सध्या ठिकठिकाणच्या मार्गावरील एसटी सेवा सुरू आहे. त्यातच नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची अडचण निर्माण झाली आहे.
विद्यानगर आणि कऱ्हाड शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. खासगी वडापचे दर सामान्यांना परवडणारे नाहीत. तसेच ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले असल्याने वडोली निळेश्वर ग्रामस्थांनी एसटी सुरू करण्याची मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन कऱ्हाड बस आगार व्यवस्थापकांना दिले आहे.
- कोट
गत आठ ते दहा महिन्यांपासून एसटी बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. सध्या विद्यार्थ्यांचे काही वर्ग सुरू झाले आहेत. त्यांची गैरसोय होत असल्याने एसटी लवकरात लवकर सुरू करावी.
- अशोक मंडले
ग्रामस्थ, वडोली निळेश्वर