पाचवड : ‘किसन वीर-खंडाळा कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे. हे सहकार मंदिर कायम गजबजत राहावं आणि या परिसराचा विकास व्हावा. याच भावनेतून यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करत आहोत,’ असे प्रतिपादन किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले.
म्हावशी (खंडाळा) येथील किसन वीर-खंडाळा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. मदन भोसले भोसले पुढे म्हणाले, सहकारात आता नव्याने काही उभे राहील, अशी परिस्थिती दृष्टिक्षेपात नाही. ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी या कारखान्याचा परवाना आणला मात्र तत्कालीन बिकट परिस्थितीमुळे हा कारखाना उभा राहण्यास विलंब झाला. शंकरराव गाढवे यांना हा कारखाना उभा राहत नाही याची खूप सल होती. त्यांची ती भावना इथल्या तमाम कष्टकरी शेतकऱ्यांची होती. त्यामुळे परिणामांची चिंता न करता हा कारखाना उभा केला.
उपाध्यक्ष गजानन बाबर, व्ही. जी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राहुल घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी तृप्ती घाडगे या उभयतांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मोहनराव भोसले, केतन भोसले, कारखान्याचे संचालक चंद्र्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, कांचन साळुंखे, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, शेतकरी, सभासद, वाहन कंत्राटदार आदी उपस्थित होते.
फोटो : १४ किसन वीर
म्हावशी (खंडाळा) येथील किसन वीर-खंडाळा साखर उद्योगाच्या गळीत हंगामांचा शुभारंभ गुरुवारी गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी मदन भोसले, गजानन बाबर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.