अरुण पवार - पाटण शेतकऱ्यांच्या जमिनी काबीज करून त्यावर पवनचक्की टॉवर उभारणी केली. पवनचक्क्यांचे साहित्य नेणारी वाहने गुंडाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून नेण्यात आली. या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश तीन महिने होऊन गेले तरी वटले नाहीत. आता मात्र, पवनचक्क्यांचे प्रतिनिधी आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार सारख्या राज्यात जाऊन बसले आहेत. फसवणूक झालेला शेतकरी मात्र पवनचक्क्यांची ओसाड पडलेली कऱ्हाड, पाटण येथील कार्यालयांमध्ये चकरा मारतोय. पोलिसांकडे देखील जातोय. गोकुळ तर्फ पाटण व काहीर गावांच्या शेतकऱ्यांना अशा संकटांचा सामना करावा लागतोय. चेक वटला नाही म्हणून पोलिसांकडे गेले असता आधीच अशा तक्रार आमच्याकडे आल्या आहेत. त्यातच पवनचक्क्यांचे प्रतिनिधी बाहेरच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यांना कुठे शोधायचे अशी उत्तरे मिळतात. मात्र, हेच खाकी वर्दीवाले पवनचक्की कंपन्यांची वाहने सुरक्षित डोंगरावर पोहोचविण्यासाठी त्यांच्याच गाडीत बसून संरक्षण देताना मोरणा परिसरातील अनेकांनी पाहिले आहे. मग बोगस धनादेश दिला म्हणून पवनचक्की कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधीवर कारवाई का होत नाही ? असा सवाल विचारला जात आहे. पवनचक्की प्रतिनिधींचे फोन बंद वीजनिर्मिती करणारे पवनचक्क्यांचे पाती कोणत्या दिशेला फिरवायची, वाऱ्याची दिशा व वेग कसा आहे, या सर्वांचे नियंत्रण सातारा, पुणे यासारख्या ठिकाणी असणाऱ्या पवनचक्की कंपन्यांच्या कार्यालयातून होते. त्यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी डोंगर पठारावर येत नाहीत. आणि आले तर कधी येतात अन् पटकन निघून जातात, ते समजत नाही. मोबाईल बंद ठेवले जातात, अशी तक्रार शेतकरी करीत आहे. तुटपुंज्या पगाराची नोकरी पवनचक्क्यांचे टॉवर उभे राहिले ते शेतकऱ्यांच्या जमिनीतच. या टॉवरमधून आता वीजनिर्मिती सुरू झाली आहे. या टॉवरची देखभाल करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांची मुले वॉचमन म्हणून तुटपुंज्या पगारावर राबत आहे. तो पगारदेखील सहा महिने मिळाला नाही, अशी तक्रार ड्युटी करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
चेक निघाले खोटे; भूमिपुत्राचे हेलपाटे!
By admin | Updated: July 25, 2014 22:14 IST