सागर गुजर - सातारा --गणेशोत्सवामध्ये भाविकांना देण्यात येणाऱ्या महाप्रसादावर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर असणार आहे. अन्नदान करण्याआधी ‘एफडीए’ (अन्न व औषध प्रशासन) चा रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. यावर शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एफडीए ने महाप्रसाद तपासावा, त्यानंतरच तो भाविकांना दिला जाईल. मात्र, परवान्याची सक्ती करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना परवाने बंधनकारक होते. मात्र, उत्सव साजरा करताना काही ठिकाणी विषबाधेचेही प्रकार घडले. सुदैवाने सातारा शहरात अशी एकही घटना आजतागायत घडलेली नाही. याबाबत साताऱ्यातील कार्यकर्ते अधिक दक्ष असतात. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यानुसार उत्सवांतील अन्नदान करताना अन्न व औषध विभागाचे परवाने सक्तीचे करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवातील इतर परवान्यांप्रमाणेच अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. मंडळांना आधीच वेगवेगळे परवाने काढण्याची सक्ती प्रशासनाने केली आहे. महाप्रसाद करताना काटेकोरपणे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. जी मंडळे महाप्रसाद देणार आहेत. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन अन्नाची तपासणी केल्यास ते सोयीचे होईल, असे काही मंडळांचे पदाधिकारी सांगतात. आरोग्याच्या दृष्टिने निर्णयाचे स्वागत होत आहे. महाप्रसादात लाडूसह फ्रूटखंडही सातारा शहरात गणेशोत्सवासह गणेश जयंती, महाशिवरात्री, नवरात्रोत्सव, हनुमान जयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांतर्फे महाप्रसाद दिला जातो. लाडू, शिरा, बुंदी, गव्हाची खिर, दूध, मलई यासोबत स्विट डिश, फू्रट सॅलिड, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ जेवणात दिले जातात. नागरिकांना महाप्रसादाचा आनंद मिळावा, या चांगल्या उद्देशाने भारुन ही मंडळी अन्नदान करत असतात. जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांमध्ये होणाऱ्या महाप्रसादाची गुणवत्ता आम्ही नेहमीच तपासतो. अन्न व सुरक्षा मानदे कायदा नव्याने अमलात आल्याने आता सर्वच उत्सवांतील महाप्रसादासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. - रामलिंग बोडके, सहायक आयुक्त, एफडीए गणेशोत्सवाच्या महाप्रसादामध्ये हजारो लोक जेवण करत असतात. दूधापासून बनविलेल्या पदार्थांतून विषबाधा होण्याची शक्यता असते. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिने हा निर्णय योग्य वाटतो. मंडळाने याला सहकार्य करावे. - रवींद्र पवार, नगरसेवक उत्सवांमध्ये प्रशासनाकडून अनेक परवान्यांची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाच्या ठिकाणी येऊन अन्नाची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घेणे मंडळांना अवघड जात आहे. - राजू गोडसे, सप्ततारा मंडळ
महाप्रसाद तपासा; परवान्याची सक्ती नको
By admin | Updated: August 19, 2014 23:44 IST