फलटण : नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चुकीचे झाल्याचा आरोप करीत तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमल, उपअभियंता बडबडे यांना फैलावर घेतले. दरम्यान, या नियोजनास आपण स्वत: जबाबदार नसून ‘कालवा समिती’चा हा निर्णय असल्याची लेखी कबुली सिद्धमल यांनी दिलीे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे महेंद्र बेडके, सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव फडतरे आदी उपस्थित होते. ‘जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत वेळोवेळी हे आवर्तन चुकीचे ठरणार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. सद्य परिस्थितीत हा प्रकार जरी योग्य वाटत असला तरी ऐन उन्हाळ्यात मात्र याचे गंभीर परिणाम होणार असल्याची कल्पनाही आपण दिली होती. सलग दोन आवर्तने देऊ नये, असेही सुचविले होते. मात्र, तरीही ही आवर्तने आपण का सोडलीत? कोणाच्या सांगण्यावरून सोडलीत? तुमचा बोलवता धनी कोण आहे? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे,’ असे सवाल करीत रणजितसिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कोणी चुकवले?’ असा सवाल उपस्थितांनी सिद्धमल यांना केला. दरम्यान, रणजितसिंह यांनी ‘नीरा उजवा कालवा समितीचा हा निर्णय असेल तर तसेच आम्हाला लेखी लिहून द्या,’ असे सांगितले व यास सिद्धमल तयारही झाले. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातून नीरा उजवा कालवा जात असतानाही या भागातील बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. धरणात हक्काचे पाणी शिल्लक असताना उसाची पिके जळून जातात, यामागे तालुक्यातील कारखानदारी मोडकळीस आणण्याचा डाव दिसत आहे. ज्यांनी हे प्रयत्न केले आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत. अन्यथा दि. ६ रोजी तहसील कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.’ (प्रतिनिधी) ‘कमिन्स’च्या पाण्यावरून रणकंदन ‘नीरा उजवा कालव्यावरून सायफनद्वारे कमिन्स कंपनी पाणी नेत आहे, यास अधिकृत परवानगी आहे का?’ असे नानासाहेब इवरे यांनी विचारले. सिद्धमल यांनी ‘परवानगी नसेल तर कमिन्सवर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. तेव्हा, ‘कमिन्सचे पाणी बंद करा व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्या,’ असे रणजितसिंह यांनी सांगितले. यावर ‘आपण उद्या स्वत: कमिन्स कंपनीस भेट देऊन पाहणी करणार असून, तत्काळ पंचनामा करून कारवाई केली जाईल,’ असे सिद्धमल यांनी स्पष्ट केले. ‘मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पाणी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी इवरे यांनी शेवटी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या : ४दुष्काळी भागातील ऊस, डाळिंब व इतर खरिपाच्या पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावेत. ४एकरी ८० टन ऊस उत्पादन गृहीत धरून एफआरपीप्रमाणे शासनाने पीक विमा व नैसर्गिक आपत्ती योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. ४डाळिंबासाठी एकरी ४ लाख रुपये उत्पादन गृहीत धरून ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत. ४शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. ४नीरा उजवा कालवा समिती बरखास्त करावी. ४पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
नीरा कालव्यावरून अधिकाऱ्यांसोबत ‘कालवा’
By admin | Updated: June 2, 2016 01:06 IST