सागर गुजर- सातारा -अजिंक्यतारा किल्ल्यावरून गोडोली तळ्याकडे वाहत येणारे भैरवनाथ व काळिंबी या मोठ्या ओढ्यांनी बुधवारी आपले रौद्ररूप दाखविले. पूर्वी या ओढ्यांचे पात्र नद्यांप्रमाणे मोठे होते. मात्र, या दोन्ही ओढ्यांना अडवून पात्र बदलण्यात आल्याने त्यांचा ‘कोप’ झाला. ओढे पाइपमध्ये बंदिस्त करण्याची अनैसर्गिक पध्दतच याला कारणीभूत असल्याचे मत परिसरविज्ञान क्षेत्रातील माहीतगार व्यक्त करत आहेत. भैरवनाथाचा आणि काळिंबीचा ओढा तसेच सुळाचा ओढा हे तिन्ही ओढे अजिंक्यतारा किल्ल्यावर उगम पावतात. या तीनही ओढ्यांचे पात्र पूर्वी बरेच रुंद होते, असे स्थानिक गोडोलीकर सांगतात. मात्र, अनेक कारणांनी हे ओढे अरुंद झाले आहेत. याला मुख्य कारण म्हणजे ओढ्यालगत बांधण्यात येणाऱ्या इमारती हे आहे. अनेकांनी ओढ्यांच्या रुंदीबाबत कागदोपत्री नोंद नसल्याचा फायदा घेत बांधकामे रेटली आहेत, तर अनेक ठिकाणी ओढ्यावर पूल बांधून त्यावर बांधकामे केल्यामुळे वाहत्या पाण्याला पुरेशा रुंदीबरोबरच उंचीही मिळत नाही. भैरवनाथाचा ओढा गोडोली गावातून वाहतो. या ओढ्यावर ठिकठिकाणी बांधकामे केली गेली आहेत. ओढ्यांची नैसर्गिक रुंदी व उंचीही कमी करण्यात आली आहे. एका ठिकाणी तर चक्क ओढ्यावर लाकडाची वखार पाहायला मिळते. वखारीखाली असणाऱ्या पुलाला छोटे पाइप बसविण्यात आले आहेत. या पाइपमधून पाणी पुढे न गेल्याने पाणी रस्त्यावर पसरले. या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली. या नैसर्गिक ओढ्याने स्वत:च आपली सीमा दाखविल्याने नगररचना विभाग नैसर्गिक बाबींचा कितपत विचार करतो, हे उघड झाले आहे. काळिंबीचा ओढा हा भैरवनाथाच्या ओढ्यापेक्षा मोठा आहे. या ओढ्याला पूर्वीपासूनच जास्त पाणी वाहते. बुधवारच्या पावसाने या ओढ्यालाही पूर आला. मात्र, अक्षता मंगल कार्यालयानजीक असणाऱ्या शेतामध्ये पाइप टाकून ओढ्याचे पात्र वळविले असल्याने पुराचे पाणी थेट रस्त्यावर आले. दुसऱ्या बाजूला भैरवनाथाचा ओढा गोडोली तळ्यालगत अडवून तोही पाईपमधून पुढे वळविण्यात आला असल्याने ओढ्यात वाहून आलेला कचरा व माती-दगडांचा गाळ तळ्याच्या भिंतीलगत अडकला. तुंबलेल्या पाण्याने वाट मिळेल तिकडे धाव घेतली. हे पाणी फॉरेस्ट कॉलनीच्या दिशेने उलटे फिरले. दोन्ही ओढ्यांचे पाणी सखल भागात जागा मिळेल तिकडे घुसले. अनेक दुकानांमध्ये तळी साठली. अनेक दुकानांचे शटर तोडून पाणी वाहिले. वाहने चिखलाने माखली. दुकानांमध्येही चिखल व पाणी साठले. गुरुवारी साफसफाई करण्याचे काम सुरू होते. नैसर्गिक ओढ्यांचा प्रवाह बदलला की काय परिस्थिती ओढवते, हे गोडोलीतल्या घटनेवरुन समोर येत आहे. गोडोली तळ्याचे काम केले जात असताना या ओढ्याचे पात्र बदलू नये, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी होती. भैरवनाथाचा ओढा अडवून त्याचे पात्र बदलल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. पालिकेने ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह अडवणाऱ्यांवर कारवाई करावी. - सुनील भोईटे, पर्यावरणतज्ज्ञओढ्यांत कचरा टाकल्याने ते तुंबतात. गोडोलीतील नैसर्गिक आपत्तीमागे कचरा प्रमुख कारण आहे. ओढ्यात कचऱ्याची पिशवी भिरकावली की काम झाले, असे काही जणांचे नित्याचे धोरण असते. याला आळा बसणे गरजेचे आहे. कचऱ्यामुळेच पाणी तुंबले आणि हाहाकार माजला.- शेखर पाटील, नागरिकबुधवारी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. गोडोली तळ्यानजीक अक्षता व धनलक्ष्मी मंगल कार्यालयांसह मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या सखल भागातील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. दुचाकी वाहने वाहून जात होती. संसारोपयोगी साहित्यासह व्यावसायिकांचे इतर साहित्य वाहून जात होते. मी हे साहित्य या पुरात उडी टाकून बाहेर काढले. काही साहित्य तळ्यानजीक शेतात असणाऱ्या विहिरीत पडले.- सचिन मोरेगोडोलीतील ओढ्यांवर अतिक्रमणे वाढल्याने त्याचे पात्र अरुंद झाले आहे. आम्ही राहतो त्या ठिकाणी पूर्वी परडे होते. या परड्यासमोरुन भैरवनाथाचा ओढा वाहत होता. २५ वर्षांपूर्वी समोर ओढ्याचे पात्र बदलून रस्ता तयार करण्यात आला आहे. बुधवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे या ओढ्यातील पाणी पात्र सोडून बाहेर पडले. माझी रिक्षा रात्रभर या पाण्यात होती.- महादेव जाधवओढ्याचे पाणी आमच्या गुरांच्या गोठ्यात घुसले. या पाण्याच्या प्रवाहामुळे म्हशीचे रेडूक वाहून गेले. आयुष्यात पहिल्यांदा असा पाऊस पाहिला. - यशोदा अहिरे
भैरवनाथ-काळिंबीचं रौद्ररूप!
By admin | Updated: August 22, 2014 00:51 IST