कऱ्हाड : कऱ्हाड शहरात नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी खास बाब म्हणून शहरातील गटारांच्या बांधणीसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५ कोटी इतक्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कऱ्हाड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कऱ्हाड शहरातील गटारींची पाणी वाहून नेण्याची क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने रस्ते लवकर खराब होत आहेत. या परिस्थितीत कऱ्हाडसाठी ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. तो निधी वितरित करण्याचे आदेशसुद्धा नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. या निधीद्वारे कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील लाहोटी प्लाझा ते कृष्णा कोयना ऑटोमोबाईल ते हॉटेल संगम कॉर्नर इथपर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याकडेने गटारसाठी बंदिस्त पाईपलाईन करणे. तसेच नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीमधील सुमंगलनगर येथील १ ते ७ गल्ली, याचसोबत मुजावर कॉलनी, शांतिनगर, दौलत कॉलोनी, रेव्हेन्यू कॉलनी, पोस्टल कॉलनी, सूर्यवंशी मळा आदी शहरातील या परिसरामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या कडेने गटारीसाठी बंदिस्त पाईपलाईन करण्यासाठी ५ कोटी इतका निधी वापरला जाणार आहे. या कामाची सुरुवात लवकरच प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.