सातारा : ''जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या जल जीवन मिशनमध्ये सातारा जिल्ह्याने २०२०-२१ मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार १ लाख ४७ हजार ६० इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,'' अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात उद्दिष्टांपेक्षा अधिक म्हणजे १ लाख ४७ हजार ६३२ इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. या उद्दिष्टपूर्तीची टक्केवारी १००.३९ इतकी आहे. जल जीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना असून, यामध्ये राज्य आणि केंद्राचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. २०२४ सालापर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतिव्यक्ती रोज किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. ''हर घर नल से जल'' असे घोषवाक्य घेऊन २०२०-२१ सालापासून जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्व परिस्थितीत शाश्वत पद्धतीने मिळावा, असे मोठे उद्दिष्ट जनजीवन मिशनचे आहे.
त्यानुसार सातारा जिल्ह्याने उद्दिष्ट मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर यंत्रणा कार्यान्वित केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग यांनी काटेकोर नियोजन केले. तालुका पातळीवर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा सर्वच घटकांनी याबाबत योग्य नियोजन केले. ग्रामीण जनतेचीही उत्कृष्ट साथ मिळत आहे. त्यामुळे १०० टक्के उद्दिष्टप्राप्ती झाली, असेदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.