मिरज : म्हैसाळ योजना व जलदूत एक्स्प्रेस गेले पाच दिवस बंद आहे. वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास सायंकाळी म्हैसाळ योजनेचे पंप व जलदूत एक्स्प्रेसद्वारे लातूरला पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकात पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात जॅकवेलजवळील गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढून एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद आहेत. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला आहे. पाणी उपसा थांबल्याने गेले पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस थांबली आहे. बुधवारी नदीपात्रात पाणी आल्यास सायंकाळी जलदूत एक्स्प्रेस लातूरला जाण्याची शक्यता आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्याने, मिरजेत पाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. म्हैसाळ योजना बंद पडल्याने म्हैसाळचे पंप कधी सुरु होणार, याची शेतकरी वाट पाहत आहेत. मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वे स्थानकाला व रेल्वे वसाहतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची ही स्थिती दोन दिवसांमध्ये बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (वार्ताहर)रेल्वे स्थानकात पाणी टंचाई : प्रवाशांचे हाल मरजेतील हैदरखान विहिरीतही पाणी नसल्याने रेल्वे स्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रेल्वे गाड्यांत पुणे स्थानकावरच पाणी भरण्यात येत असून मिरज स्थानकात प्लॅटफॉर्मवरील नळाचे पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नदीत उपलब्ध असलेले पाणी एका मोटारीद्वारे उपसा करुन रेल्वे स्थानकास पाणी पुरवठ्याच्या प्रयत्न सुरू आहे. पाण्याअभावी रेल्वे स्थानकावर साचलेला मैला साफ करता आला नसल्याने स्थानक परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
‘जलदूत’ आजपासून पुन्हा
By admin | Updated: May 25, 2016 00:20 IST