लोकमत न्यूज नेटवर्क
बाेरगाव : महापूर व कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीतही यशवंत ग्रामीण पतसंस्थेने एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षात ३२ लाख १३ हजार नफा मिळविला आहे, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशील अशोकराव पाटील यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील उपस्थित होते.
धैर्यशील पाटील म्हणाले, संस्थेचे भागभांडवल ९९ लाख ५० हजार ५५२ रुपये असून, संस्थेच्या ठेवी २२ कोटी ७ लाख २४ हजार आहेत. संस्थेने अहवाल सालात १६ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे. एनपीए शून्य टक्के असून, अहवाल सालात संस्थेला ३२ लाख १३ हजार १९८ रुपये नफा झाला आहे. थकबाकी २.४० टक्के आहे. मार्च २०२० अखेर संस्थेने नेहमी अ-ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे.
यशवंत पतसंस्थेचे प्रधान कार्यालय बोरगाव (ता. वाळवा) येथे आहे, तर इस्लामपूर व ताकारी येथे शाखा कार्यरत आहे.
संस्थापक अशोकराव पाटील यांच्या आदर्श कार्यप्रणालीचा पायंडा जपत ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे माध्यमातून सभासद विमा, मृत सभासदास अंत्यविधीसाठी खर्च ठेवीदारास बक्षीस सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष उदय पाटील, संभाजी पाटील, उद्धव शिंदे, सर्जेराव घाडगे, शिवाजी पाखले, मनीषा पाटील, सचिव सदानंद शिंदे उपस्थित होते.