लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे आठवडी बाजार मुख्य पेठ असणाऱ्या रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी आहे. ग्रामपंचायत प्रशासन बाजार भरविण्यासाठी पर्याय असताना दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष दिल्यास ग्रामसचिवालय व एसटी बसस्थानक परिसरात मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे आठवडा बाजार या ठिकाणी सुरू होऊ शकतो. आठवडी बाजार हा गुरुवारी असून, हा बाजार दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असतो. या बाजारामुळे सांगली ते सातारा रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
रस्त्यावर भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना व व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
रात्रीच्या बाजारामुळे बाजारातून विनाकारण फिरणारे युवक, बाजारातून जाणाऱ्या दुचाकी गाड्यांचा मोठा त्रास होतो. याचबरोबर गर्दीचा फायदा घेऊन लोखो रुपयांचे मोबाईल बाजारातून चोरीस गेले आहेत. वांगी हे गाव अनेक लहान खेडयांना जोडले आहे. याचबरोबर परिसरात ऊसतोड करण्यासाठी सोनहिरा, क्रांती, कृष्णा, ग्रीनपावरशुगर, यशवंत- नागेवाडी, तासगाव कारखान्यांकडे येणारे मजूरही आठवडी बाजारास येत आहेत. कर्नाटकातील इतर पंधरा ते वीस कारखान्यांना आलेले ऊसतोड मजूर त्यामुळे दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारात मोठी गजबज असते. या बाजारात भाजीपाला, कपडे खरेदी व विक्री करण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
गावातील वाड्या-वस्त्यांवरून व परगावाहून आलेल्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने सर्व वाहने रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे सांगली- सातारा व गावांत जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. पलूस, सांगली, कडेपूर, सोनहिरा कारखान्याकडे जाणारी वाहतूक थांबली जाते.
तरी एसटी बसस्थानक परिसर किंवा ग्रामसचिवालय परिसरात मोठया ठिकाणी बाजार भरवल्यास वाहतुकीबरोबर इतर असणाऱ्या समस्या दूर होतील.