मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचले आहे. दोन दिवसांत जतपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. उन्हाळी आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
म्हैसाळ योजना सुरू झाल्याने मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून उन्हाळी व पावसाळ्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात येते.
गतवर्षी चांगल्या पावसामुळे पाण्याला मागणी नसल्याने नोव्हेंबर व डिसेंबरचे आवर्तन रद्द करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारीअखेर उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने आवर्तन सुरू करण्यात आले आहे. विहीर व कूपनलिकाची पाणीपातळी घटल्याने सद्यःस्थितीत पिकांना पाण्याची गरज आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचले असून, विस्तारित गव्हाण योजना सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत जतपर्यंत पाणी पोहोचणार आहे. म्हैसाळचे आवर्तन जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.