सांगली : कोयना, वारणा धरण क्षेत्रात आजही पाऊस सुरूच असल्यामुळे धरणे फुल झाली आहेत. वारणा (चांदोली) ९९.८६ टक्के, तर कोयना धरण ९६.१९ टक्के भरले आहे. सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वाची असलेली वारणा, कोयना धरणे फुल झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
कोयना, धाेम, कण्हेर, उरमोडी, तारळी ही धरणे सातारा जिल्ह्यात आहेत; पण या धरणाचा सांगली जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्यासाठी खूप फायदा होतो. कोयना धरणात सध्या १०१.२४ टीएमसी पाणीसाठा असून क्षमता १०५.२५ टीएमसीची आहे. धरणातील पाणीसाठा आणि कंसात धरणाची क्षमता पुढीलप्रमाणे : धोम १२.०४ (१३.५०), कन्हेर ९.३३ (१०.१०), धोम बलकवडी ४.०४ (४.०८), उरमोडी ८.५० (९.९७), तारळी ५.५७ (५.८५), अलमट्टी १२२.०६ (१२३) टीएमसी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. वारणा धरणात ३४.४० टीएमसी पाणीसाठ्या क्षमता असून सध्या धरणात ३४.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणात ९९.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. बहुतांश धरणे फुल झाल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटला आहे. सप्टेंबर निम्मा संपत आला तरीही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे.